प्रतिनिधी/कराड
महाराष्ट्रातील शिंदे – फडणवीसांचे सरकार ज्या पध्दतीने स्थापन झाले आहे हे वैचारीक आणि सुसंस्कृत महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. हे सरकार असंवेदनशील असून त्यांच्याकडे महाराष्ट्राच्या भल्याचा काही विचार नाही. कोण काहीही आणि कोणत्याही थराला जाऊन वागत -बोलत आहे. या सरकारचे कामकाज पाहिल्यानंतर मनाला खूप वेदना होत आहेत, अशी खंत खा. सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी कराड येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
दरम्यान आरएसएस संघटनेवरील बंदीबाबत मागणी होत असेल तर यावर चर्चा व्हायला हवी, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
येथील शासकीय विश्रामगृहात ही पत्रकार परिषद झाली. यावेळी खा. श्रीनिवास पाटील, माजी सहकार व पणन मंत्री आ. बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, मानसिंगराव जगदाळे, देवराज पाटील, महिला आघाडीच्या माई साळुंखे, प्रशांत यादव यांच्यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाराष्ट्रात सध्या सरकारकडून चुकीच्या पध्दतीने कारभार सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू असणारी कामे शिंदे सरकारने बंद केली. निधी अडवला. सुसंस्कृत महाराष्ट्राला हे शोभत नाही. विकासकामांवर मोठा परिणाम झाला आहे. आम्ही मागणी केल्यानंतर आत्ता पालकमंत्री नेमले गेले. एका मंत्र्याकडे दोन- तीन तर कोणाकडे याहून अधिक जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. ते कसे काम करणार त्यांनाच माहीत. पण सध्या जे सुरू आहे ते राज्यासाठी धोक्याचे आहे. हे सरकार किती दिवस टिकेल सांगता येत नाही.
हे सरकार ईडीचे सरकार आहे. ईडीने केलेल्या कारवायांमध्ये पंच्चांन्नव टक्के कारवाया या विरोधी पक्षांच्या नेत्यांवर झाल्या आहेत. खोक्यांचा विषय तर गल्ली बोळात पोहचला आहे. उलट या सरकार मधील नेते उघडपणे म्हणतात तुंम्हाला पाहिजेत काय खोके, यावरून त्यांचे राजकारण कोणत्या थराला गेले आहे हे लक्षात येते.
माजी केंद्रिय मंत्री लालूप्रसाद यादव यांनी पीएफआय वरील बंदीप्रमाणे आरएसएसवर बंदीची मागणी केली आहे. यावर मत व्यक्त करताना खा. सुळे म्हणाल्या, अशी मागणी होत असेल तर या विषयावर चर्चा व्हायला हवी. ही चर्चा संविधानाच्या चौकटीत राहून झाली पाहिजे. पंकजा मुंडे यांच्या नाराजीवर खा. सुळे म्हणाल्या, रक्ताची नाती प्रेमाची जिव्हाळ्याची असतात. शेवटी नाती महत्वाची असतात.