सरसंघचालक मोहन भागवत यांचा विश्वास
हरिद्वार / वृत्तसंस्था
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी, येत्या 10 ते 15 वर्षांमध्ये अखंड भारताची निर्मिती होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. आपण सर्वांनी एकत्रितरित्या प्रयत्न केले तर हे स्वप्न साकार होणे अशक्य नाही, असे विधान त्यांनी गेल्या बुधवारी हरिद्वार येथील एका कार्यक्रमात केले. हा कार्यक्रम येथील पूर्णानंद आश्रमात आयोजित करण्यात आला होता.
सनातन धर्म आणि भारत हे समानार्थी शब्द आहेत. तथापि, जेव्हा राज्य बदलते तेव्हा राजाही बदलला जातो. सध्या भारताची सातत्याने प्रगती होत आहे. या प्रगतीला जे अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करतील ते मिटून जातील. सनातन धर्म हेच हिंदू राष्ट्र आहे. आमच्या मनात कोणाच्याही विरोधात कोणताही द्वेष, मत्सर किंवा शत्रुत्व नाही. तथापि, जगात सामर्थ्यालाच मान दिला जातो. त्यामुळे आम्ही अहिंसावादीच आहोत पण आमची अहिंसा सामर्थ्याच्या आधारावर कार्य करणारी आहे. आमची अहिंसा हातात लाठी घेऊन कार्य करते. गेल्या एक सहस्त्र वर्षांमध्ये ज्यांनी आम्हाला संपविण्याचा प्रयत्न केला, ते विफल ठरले आहेत. आजही आम्ही सनातन धर्मियच आहोत, असे सूचक प्रतिपादन त्यांनी केले.
हिंदुत्व ही जोडणारी शक्ती
हिंदुत्व ही सर्वांना जोडणारी शक्ती आहे. त्यामुळेच हिंदुत्वाच्या विरोधकांना माघार घ्यावी लागली आहे. गेली सहस्र वर्षे घाव सोसूनही सनातन धर्म आजही स्थिर आहे. भारत एक असा देश आहे की जेथे आल्यानंतर जगातील कोणत्याही माणसाची दुष्प्रवृत्ती नष्ट होते. बाहेरुन आलेल्या शक्ती येथे आल्यानंतर एकतर सुष्ट शक्ती होतात किंवा मिटून जातात, असे प्रतिपादनही सरसंघचालकांनी केले.