वार्ताहर / कास :
कास पुष्पपठारच्या हंगामाला चार दिवसापूर्वीच प्रारंभ झाला असून, पर्यटकांची पाऊले या नैसर्गिक फुलांच्या मळ्याकडे वळू लागली आहेत. यामध्ये काही वरिष्ठ अधिकारी पदाधिकाऱ्यांनी कास पठारला भेट देऊन निसर्गाचा मनमुराद आनंद लुटल्याचे पहायला मिळाले. आज चक्क केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनाच कास पठारच्या फुलांची भुरळ पडली. त्यांनी पुष्प पठार भेट देऊन निसर्गाचा आनंद लुटला. कास हे निसर्गाचं अनमोल ठिकाण असून त्याचं जतन झालं पाहिजे. येथील वनसंपदेचे आणि वनऔषधींचे संशोधन झालं पाहिजे, असेही ते म्हणाले.
श्रीपाद नाईक हे आपल्या खाजगी दौर्यानिमीत्त मंगळवारी रात्री कास परिसरतील एका हॉटेलमध्ये मुक्कामी राहण्यास आले असल्याची माहिती समोर आली. बुधवारी दुपारी त्यांनी कास पुष्प पठारला भेट दिली. पठारवरील नैसर्गिक रंगीबेरंगी फुलांचा आनंद घेताना विविध फुलांची माहीती करून घेतली. मात्र सततच्या पावसामुळे फुले पाहण्यात काहीसा अडथळा निर्माण झाला. यावेळी त्यांनी वन वनसमीतीच्या कामाचा आढावा घेतला. वनसमीतीने पुष्पपठारची फोटो फ्रेम देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी जावली तहसीलदार राजेंद्र पोळ, वनक्षेत्रपाल रंजनसिंह परदेशी, वनपाल राजाराम काशीद, वनरक्षक स्नेहल शिंगाडे, सुनिल शेलार, निवृत्त वनपाल श्रीरंग शिंदे उपस्थित होते.