नवी दिल्ली : महाराष्ट्रातील तीन हस्त शिल्पकारांना राष्ट्रीय ‘शिल्प’ पुरस्काराने केंद्रीय वस्त्र मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांच्या हस्ते आज सन्मानित करण्यात आले. दिल्लीतील विज्ञान भवनात केंद्रीय वस्त्र मंत्रालयाच्यावतीने वर्ष 2017, 2018, आणि 2019 साठीचे ‘शिल्प गुरू पुरस्कार’ (Shilp Guru Award ) आणि ‘राष्ट्रीय पुरस्कार’ (National Award) प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी उपराष्ट्रपती जगदीप धनखड़, (Jagdeep Dhankad) केंद्रीय वस्त्र मंत्री श्री गोयल, केंद्रीय वस्त्र सचिव रचना शहा, हस्तकला विकास आयुक्त व्यासपीठावर उपस्थित होते. उपराष्ट्रपती यांच्या हस्ते ‘शिल्प गुरू’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रीय ‘शिल्प’ पुरस्कार केंद्रीय मंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
‘शिल्प गुरू’ पुरस्काराचे स्वरूप सुवर्ण पदक ताम्रपत्र आणि दोन लाख रूपये रोख असे आहे. तर, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त हस्त शिल्पकारांना ताम्रपत्र आणि 1 लाख रूपये रोख असे पुरस्कारास्वरूप प्रदान करण्यात आले.
महाराष्ट्रातील तीन हस्त शिल्पकार सन्मानित
कोल्हापूरचे अमर सातपुते यांना चामड्यापासून कोल्हापूरी चपला हाताने बनविण्याच्या कारीगिरीसाठी आज राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. श्री. सातपुते यांना वर्ष 2019 साठीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्री. सातपुतेंचा चामड्यापासून चपला बनविण्याचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे.
अमर सातपुते (Amar Satpute) हे या व्यवसायात वर्ष 2005 पासून स्वच्छेने काम करीत आहेत. वडीलांकडून त्यांनी चपला बनविण्याचे बारकावे शिकल्याचे श्री. अमर यांनी पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर सांगितले. हस्तकला विभागाकडून महाराष्ट्राबाहेर अनेक ठिकाणी प्रदर्शन निमित्त स्टॉल लावण्याची संधी मिळते. यातून आणखी काही कल्पना सुचत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यवतमाळच्या रजनी शिर्के (Rajni Shirke) यांना भरतकाम हस्तकलेसाठी वर्ष 2019 च्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्रीमती शिर्के यांनी 32 वर्षांपूर्वी मध्यप्रदेशातून विशेष भरतकामाचे प्रशिक्षण घेतले. सध्या त्या यवतमाळ आणि परिसरात बचत गटांतील मुलींना- महिलांना भरतकाम शिकवित असल्याचे पुरस्कार प्राप्त केल्यानंतर सांगितले.
अभय पंडित (Abhay Pandit) यांना कुंभार कामांसाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्री पंडित यांना वर्ष 2018 च्या राष्ट्रीय हस्त शिल्प पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कोल्हापुरातील कारागिरांना अशा पद्धतीचा पुरस्कार मिळणे ही कोल्हापूरची मान अभिमानाने उंचावण्याची बाब आहे. अशा कारागीरांना असे प्रोत्साहन मिळत असेल तर अनेक कारागीर तयार होतील. चर्मकार समाज सध्या मद्रासी प्रेसच्या चामड्याचा वापर करून कोल्हापुरी चप्पल बनवत आहे. मात्र जुन्या पद्धतीची नव्या कारागिरांनी पुन्हा विकसित केली पाहिजे. चर्मकार समाजातील अनेक कारागिरांना पुढे आणण्यासाठी राज्य शासनाने त्यांना अर्थसहाय्यसह विविध योजना राबिवल्या पाहिजे.
अमर सातपुते– बहिरेश्वर, ता. करवीर