आज स्वामी विवेकानंद जयंती. त्यानिमित्त हा लेख प्रसिद्ध करत आहोत.
भारत देशाच्या शेकडो वर्षाच्या इतिहासाच्या कालखंडात मानवतेचे सार निर्भयपणे, स्पष्टपणे व सत्याचा शोध घेण्याच्या विलक्षण साहसाची आठवण करताना सर्वात पहिल्यांदा ज्यांचे स्मरण होते, ते म्हणजे निर्भयतेचे प्रतीक स्वामी विवेकानंद. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1863 ते महानिर्वाण 4 जुलै 1902, या कालखंडात अनेक व्यक्ती त्यांनी जगामध्ये प्रवास करताना मिळविल्या, किंबहुना स्वतःहून काही व्यक्ती त्यांच्याकडे आल्या.
कला शाखेची पदवी घेतलेले नरेंद्रनाथ उपाशीपोटी दारोदार हिंडत असताना त्यावेळचे प्रसिद्ध कथामृतकार महेंद्रनाथ गुप्ता यांच्या नजरेस पडले. त्यांना नरेंद्रच्या बुद्धीची व चारित्र्याची जाणीव होती. त्यांनी एका शिक्षण संस्थेत महिना 15 रु. प्रमाणे कामास लावले. महेंद्रनाथ हे त्यांचे वडीलमित्र. या संस्थेत त्यांनी एकच वर्ष काम केले. नंतर त्यांनी कोठेही नोकरी केल्याची नोंद नाही. साधारणतः नोव्हेंबर 1881 मध्ये कलकत्यात सुरेंद्रनाथ मित्र यांच्या घरी एका मंगल कार्यक्रमात रामकृष्ण परमहंसांना बोलाविले होते व भावगीतांच्या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. गाणारे गायक येऊ शकले नाहीत, म्हणून सुरेंद्रनाथांच्या शेजारी राहणाऱया नरेंद्रनाथांना भावगीते म्हणण्यासाठी बोलाविण्यात आले. त्यावेळी त्यांचे वय 18 वर्षे होते. नरेंद्रनाथांनी इतके सुंदर गायन केले की, कधी नव्हे ते रामकृष्ण परमहंस खूप खूष झाले व अत्यंत प्रसन्न चित्ताने आशीर्वाद देत म्हणाले, बाळ नरेंद्र, दक्षिणेश्वरी भेटायला ये. हीच त्यांची पहिली भेट.
नरेंद्रनाथ हे जेव्हा 1885 मध्ये (वय वर्षे 22) संन्यास घेऊन म्हणजे घर सोडून निघून गेले, तेव्हा काही मित्रांनी एकत्र करून रु. 100 ची मनिऑर्डर त्यांच्या घरी निनावी पाठविली होती. त्यामधून भुवनेश्वरी मातेचा घरखर्च 3 महिन्यांचा खर्च भागला होता. स्वामीजी रामकृष्णांच्या मठामध्ये असताना स्वतःच्या राहत्या घरासंदर्भात एक खटला चालू होता. रामकृष्णांनादेखील हे माहीत होते. त्या काळात रामकृष्णांच्या मठातील शशी (स्वामी रामकृष्णानंद) व शरद (स्वामी सारदानंद) यांनी बाली हायस्कूलमध्ये मास्तरकी करून त्यांना रु. 80 एवढी मदत केली होती. गुरुबंधूंनी काळजी घेण्याचे एवढे मोठे उत्तम उदाहरण दुसरे कुठले. त्याचप्रमाणे रामकृष्णांचे प्रसिद्ध शिष्य राखाल (स्वामी ब्रह्मानंद) या गुरुबंधूंनीही मोठी मदत मिळवून दिली होती. रामकृष्ण परमहंस स्वतः गुप्ततेने अक्षरशः घरच्यासारखी घरच्यांची काळजी घेत असत.
मेरी लुई बर्क यांनी विवेकानंदांच्या पत्रांचा एक संशोधनपर ग्रंथ लिहिला आहे. त्याची माहिती सहा खंडात उपलब्ध आहे व तो ग्रंथ इंग्लंडमध्ये प्रसिद्ध झाल्यावर त्या ग्रंथामध्ये असलेल्या पत्रातील लेखकांमुळे विवेकानंदांचा लोकसंग्रह किती होता हे भारतीयांपेक्षा इंग्रजांना आधी कळले. 4 जून 1899 या दिवशी राजस्थानमधील खेताडीचे महाराज अजितसिंह यांनी एका संन्याशाला धर्माविषयी राजमहालामध्ये अर्धा तास चर्चा करण्याकरिता बोलावले व अजितसिंह यांनी 5 तास एवढा वेळ प्रथमच दिला असेल. या एकाच भेटीमुळे त्या संन्याशाचे ते कायमचे मित्र झाले. जसे काही राजे अजितसिंहाचे हृदय या संन्याशाने जिंकून घेतले होते. अर्थातच या संन्याशाचे नाव होते स्वामी विवेकानंद. नंतर स्वामींनी जवळजवळ पाच महिने खेताडीच्या महाराजांच्या घरी निवास केला. या पाच महिन्यात त्यांनी खेताडीच्या महाराजांचे जीवनच बदलून टाकले. स्वामी विवेकानंद हे संन्याशी जरी असले तरी मातृभक्त आहेत. खेताडीचे महाराज स्वामींजींच्या आईंना रु. 100 दर महिना जोपर्यंत आई भुवनेश्वरी जिवंत होत्या तोपर्यंत देत होते.
स्वामीजी हे काही सामान्य आचारी नव्हते. ते संशोधक होते. खरेतर त्यांनी स्वधर्मातून माणसांच्या मनाचे संशोधन केले होते. नुसते भाषण देणारे साधे वक्ते नव्हते. त्यांचे आचरण एवढे प्रभावी होते की, अति सामान्य ते अति उच्च दर्जाच्या सर्व स्तरावरील लोकांचे मन जाणणारे होते. जानेवारी 1896 मध्ये अमेरिकेच्या एका भाषणानंतर त्यांच्याकडे वेद उपनिषदांची मोठी चर्चासत्रे झाली. त्याला अनुसरूनच त्यांनी भारतातून उपनिषदे व वेद यांच्या प्रती मागविल्या होत्या.
उत्तर कॅलीफोर्नियामध्ये स्वयंपाक घरात काम करणारे स्वामीजी फारच प्रभावी दिसत होते. विवेकानंद हे विलक्षण व्यक्तिमत्त्व असे आहे की, कॅलीफोर्नियात स्वयंपाकघरामध्ये खिचडी शिकविताना गीतेचा अठरावा अध्याय म्हणून घेत असत. स्वतः घरातील लोकांना खिचडी करून वाढत असत. खिचडी आणि भगवत गीता हा अपूर्व योग त्यांनी जुळवून आणला होता. स्वामीजींच्या जीवनात फार मोठी कामगिरी कोणी केली असेल तर ती श्रीमती जॉर्ज ब्ल्यू. हेल यांनी. सर्वधर्म परिषदेसाठी रस्त्यावर भिक्षा मागणाऱया या हिंदू संन्याशाला अनोळखी असताना फक्त त्याच्या पोशाखावरून मदत करणारी ही अमेरिकन माता खरोखरीच भाग्यवान आहे. स्वामीजींचे कार्य त्यांनी पुढे खूपच चांगल्या प्रकारे केले. 11 सप्टेंबर 1893 हा दिवस स्वामीजींच्या जीवनाला अतिउच्च वळण देणारा ठरला होता, तो या मातेमुळेच.
अमेरिकेतील सुप्रसिद्ध वक्ते रॉबर्ट इंगरसेल यांच्यासारखे स्वातंत्र्यप्रिय गृहस्थदेखील स्वामीजींचे विश्वासू बनले. यावरूनच आपल्याला लक्षात येते की, स्वामीजींचे आचरण व चारित्र्य यांचा प्रभाव अमेरिकेतील उच्च व्यक्तींवरही होता. गुडव्हील या लघुलेखकाने स्वामीजींच्या भाषणाचा गोषवारा तयार करण्यासाठी फार मोलाचे कार्य केले. पहिल्यांदा स्वामीजींची मुलाखत घेतली. नंतर त्यांच्या भाषणाचे लघुलेखन केले. प्रा. मॅक्समुलर हे प्रसिद्ध तत्त्ववेत्ते भारतीय संस्कृतीचा द्वेष करणारे परंतु नंतर वेदांचा अभ्यास करून त्यांच्या मनावर एवढा परिणाम झाला की, त्यांनी संपूर्ण आयुष्य वेदांच्या प्रचारासाठी घालविले. तेव्हा स्वामीजींचा प्रभाव त्यांच्यावर चांगला झाला. त्यांची मैत्री दीर्घकाळ टिकून होती. त्यांचे हिंदू धर्माबद्दलचे मत निर्मळ होण्याकरिता स्वामींजींनी खूप महत्त्वाचे कार्य केले. जर्मनीतील किम शहरातील विश्वविद्यालयातील प्राध्यापक पॉल डाईसन यांचापण उल्लेख त्यांच्या लोकसंग्रहामध्ये आवर्जून करावा लागेल. स्वामीजींच्या एकाच भेटीमुळे या माणसाचे आयुष्यच बदलून गेले. पुढील काळात जर्मनी येथे वेद व संस्कृती पसरविण्याचे काम पॉल डाईसनी शेवटपर्यंत केले. स्वामीजींचे आणखी एक मित्र सुप्रसिद्ध उद्योगपती जमशेठजी टाटा होत. भारतप्रिय असल्यामुळे त्यांना आपल्या भारतीय संस्कृतीविषयी प्रेम व आदर होता. तरुणांसाठी उद्योग सुरु करावा असे त्यांच्या मनात होते. त्यांनी ही कल्पना मांडली आणि स्वामीजींनाही खूप आनंद झाला. त्यांनी भारताचा नकाशा मागविला व त्यावर एके ठिकाणी हात ठेवला व सांगितले की या ठिकाणी लोखंडाचा कारखाना चालू करा. जमशेठजी टाटा पण आश्चर्यचकित झाले. पृथ्वीच्या पोटात काय दडले आहे, हे एका ठिकाणी बसून अंतर्ज्ञानाने जाणून घेणे ही केवढी मोठी शक्ती आहे याची त्यांना जाणीव झाली.
डॉ. नंदकिशोर एकबोटे