पुणे / प्रतिनिधी :
राज्याच्या विविध भागाला गुरुवारी अवकाळी पावसाने पुन्हा तडाखा दिला. यामुळे शेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकऱ्यांपुढील संकट अधिक गडद झाले आहे. दरम्यान, विदर्भ तसेच मराठवाडय़ातील तुरळक भागात गारपिटीचीही नोंद झाली आहे.
मागच्या काही दिवसांत राज्यातील काही भागामध्ये अवकाळी पावसाची नोंद झाली होती. तर काही ठिकाणी गारपीटही झाली. त्यामुळे दाक्ष, केळी, आंबा, गहू, कांदा यासह विविध पिकांना त्याचा मोठा फटका बसला होता. त्यानंतर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट अधिक गहिरे झाल्याचे पहायला मिळत आहे. वातावरणातील बदलामुळे राज्याला गुरुवारी पुन्हा अवकाळीचा तडाखा बसला. बुधवारी काही भागांत पावसाची नोंद झाली होती. मात्र, गुरुवारी ही तीव्रता अधिक वाढली. पुणे, पिंपरीसह काही जिल्हय़ांमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर अचानक अंधारून आले आणि पावसाला सुरुवात झाली. अनेक भागांत चांगल्या पावसाची नोंद झाली. संध्याकाळनंतरही हा पाऊस सुरूच होता.
पश्चिम, उत्तर महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाडय़ालाही दणका
याशिवाय नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, सातारा, रायगड, सांगली, कोल्हापूर, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, नांदेड, परभणी, औरंगाबाद या जिल्हय़ांना अवकाळीने झोडपले. यामुळे या भागातील कांदा, दाक्ष, गहू. केळी आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जोरदार वारे, त्यात पावसाच्या तडाख्याने पिके जागेवरच झोपल्याचे चित्र काही भागांत पहायला मिळाले. या महिन्यात दुसऱ्यांदा अवकाळीचा तडाखा बसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
दोन दिवस व्यापक पाऊस
दरम्यान, राज्यातील कोकण, मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्राच्या भागात पुढील दोन दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यानंतर पुढील दोन दिवस विदर्भात यलो अलर्ट राहील.
कमाल तापमान घटणार
पुढील दोन दिवसांत राज्यातील कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट होणार असून, त्यानंतरही ते कायम असेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.