त्या दिवशी वृषाली आली ती वेगळय़ाच मूडमध्ये. ‘हल्ली काय होतंय कळत नाही गं. डोकं फुटायची वेळ आली आहे. मी शरीराने असते एका ठिकाणी, मनाने तिसरीकडेच. असंख्य विचार डोक्मयात थैमान घालतात. कारण म्हणशील तर काहीच नाही. एका विचाराचा दुसऱयाशी संबंध असतो असेही नाही. पण… खूप विचार येतात. एक विचार आला की दुसरा. तिसरा. मालिका सुरुच. विचारांना कितीही थांबविण्याचा प्रयत्न केला तरीही विचारचक्र सुरूच राहते. खूप थकायला होतं. एकप्रकारचा ताण जाणवायला लागतो. काहीवेळा डोकं दुखतं, खांदे दुखतात. भरकटल्यासारखंच होतं. परवा पहाटे फिरायला गेले. चालता चालता विचारांच्या तंद्रीत घर कधी आलं हे कळलंच नाही. घरासमोर दोन मिनिटे थांबले आणि लक्षात आलं आपण पोहचलोही. माझं मलाच आश्चर्य वाटलं. रस्त्यात कुठे काही झालं असतं तर? नजरेसमोर मुलं, नवरा, आई-बाबा सगळेच आले आणि मग कल्पनेनेच सर्रकन अंगावर काटा आला. माझ्यातला हा बदल मला जाणवतो आहे. पण नेमकं काय करावं ते सुचत नाही’ असं म्हणून ती रडू लागली.
‘बरं..शांत हो. आपण पाहू काय करायचं ते.’
‘पण, यातून मी नक्की बाहेर पडेन ना? कारण मला हे सगळं असं नकोय गं.’
‘अगदी नक्की बाहेर पडशील.’
‘मी अस्वस्थ होते कारण विचार कसलेही येत असतात. कितीवेळा सारं लिहून काढलं, स्वतःला समजवायचा प्रयत्न केला पण विचारांच्या प्रवाहात इतकं भरकटायला होतं की काही समजत नाही. मधेच एकदम झोपेतून जाग आल्यासारखं होतं आणि काय हे, आपलं लक्ष कुठं आहे, आपण कृती काय करतो आहोत आणि मन कुठे भरकटत आहे याची तपासणी सुरू होते. कशाचा कशाशी ताळमेळ नाही अशी तऱहा होते.’ वृषाली मोकळेपणाने आपली समस्या मांडत होती.
खरंतर विचार करणे हे आपल्या मेंदूचे कामच आहे परंतु विचारांच्या एका पाठोपाठ एक अशा अनेक फाईल्स मेंदूमध्ये ओपन होऊ लागल्या तर मात्र असा गोंधळ होऊ लागतो. भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टींचे विचार, भविष्याचे नियोजन वा त्या संदर्भातील विचार येणे हे स्वाभाविक आहे परंतु आपण सतत भूतकाळ आणि भविष्याचा विचार करत राहिलो तर मात्र आपल्याला वर्तमानात जगणे अवघड होऊन जाते. अकारण ताण निर्माण होतो आणि जे करतो आहोत त्यातील आनंद घेता येत नाही. म्हणून विचारांच्या प्रवाहात पोहायला शिकण्याचे कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे. ते आपण करू शकलो तरच यशाचा किनारा गाठणे सोपे होईल.
पूर्वी काही लेखात उल्लेख केल्याप्रमाणे आपण कोणतीही गोष्ट ज्यावेळी पहिल्यांदा करायला शिकतो तेव्हा ती लक्षपूर्वक करतो. आपला मेंदू त्यामध्ये गुंतलेला असतो. उदा. सुरुवातीला गाडी शिकताना आपले सगळे लक्ष तिथेच असते. पुढे सराव झाल्यानंतर मेंदू ते काम आपल्या सहकाऱयांकडे अर्थात मज्जारज्जूकडे सोपवतो. कारण विचार करणे हे मानवी मेंदूचे अधिक महत्त्वाचे काम आहे. सरावाची कृती झाल्यावर तसे केले गेले नाही तर आपण नवीन कोणतीही गोष्ट शिकू शकणार नाही. त्यामुळे ते नैसर्गिक रीतीने घडत असते. म्हणजेच कृतीची सवय झाली की ती यांत्रिकतेने घडू लागते. आपण ऑटो पायलट मोडवर राहतो. त्यामुळे कृती सुरू राहते आणि मन मात्र भूतकाळ, भविष्य यातच पळत राहते. त्यामुळे मानसिक दमणूक तर होतेच आणि काही वेळा विचार आणि वास्तव यातले भान रहात
नाही.
‘साक्षी ध्यान’ तंत्राने मेंदूची विचारांच्या प्रवाहात वहात जाण्याची सवय बदलता येणे शक्मय आहे. जसे श्वासाच्या स्पर्शावरती लक्ष देण्याचा सराव हा सजगता वाढवण्याचा एक महत्त्वाचा मार्ग आहे. त्याचा सराव झाला की हळूहळू मनात येणारे विचार साक्षीभावाने म्हणजेच त्या विचारांना चांगले वाईट अशी प्रतिक्रिया न करता न्याहाळण्याचा सराव करायचा. दररोज दहा मिनिटे शांत बसून मनामध्ये काय चालले आहे हे पहायचे. जसे आपण उत्सुकतेने एखादी गोष्ट न्याहाळतो तसे उत्सुकतेने येणारे विचार पहायचे. अगदी सुरुवातीला हे जमत नाही. काहीवेळा त्या विचार प्रवाहात गुरफटायला होते. तसे होत असेल तर विचारांचे काऊंटिंग करायचे. एक, दोन, तीन असे मनात येणारे विचार मोजायचे. कारण अशा पद्धतीने आपण जेव्हा काऊंटिंग सुरू करतो ते करण्यासाठी त्या विचारापासून आपल्याला वेगळे व्हावे लागते. प्रयत्नपूर्वक हे करत राहिले तर या सरावाने विचारांची सजगता वाढते.
यातला तिसरा मार्ग वा टप्पा म्हणजे शरीराची सजगता. स्कॅनर जसा कागदावरती फिरतो तसेच मनाने ‘बॉडी स्कॅन’ करायची. जणू प्रत्येक अवयवाशी आपण संवाद साधत आहोत अशा पद्धतीने शरीरावर जाणवणाऱया संवेदना पहायच्या. समजा आता कुठेतरी धडधड जाणवते आहे तर त्याचा स्वीकार करायचा. उत्सुकतेने ती कितीवेळ तशीच राहते आहे की कमी होते आहे हे न्याहाळायचे. कोणतीही प्रतिक्रिया न करता ते जाणत राहायचे.
सजग कृतीच्या माध्यमातूनही हे करता येते. आपल्या कृती जेव्हा सवयीच्या होतात त्यावेळी त्या बऱयाचदा यांत्रिकतेने होत असतात. सुरुवातीच्या उदाहरणातील मनालीसारखी अनेकदा अनेकांची स्थिती होते ती यामुळेच. वरती उल्लेख केल्याप्रमाणे अनेकदा आपण ‘ऑटो पायलट मोड’ वरती असतो. म्हणजे जे करत असतो ते यांत्रिकतेने होत असते आणि मन विचारात गुंग असते. सजग कृती करायची म्हणजे काय तर ती कृती जाणीवपूर्वक तिथे लक्ष देत करायची. सर्व हालचाली जाणीवपूर्वक करायच्या. असा संकल्प करायचा की मी रोज एखादी कृती जाणीवपूर्वक करेन. उदा. जेवताना मी सजग राहीन. मग त्यासाठी काय करायचे तर समोर ताटात असलेले पदार्थ, त्यांचा रंग, आकार न्याहाळायचे. समरसून त्यांचा सुगंध अनुभवायचा, घास तोंडात ठेवल्यानंतर त्याची चव, स्पर्श हे जाणायचे. थोडक्मयात सांगायचे तर पंचेंद्रियांनी तो अनुभव अगदी समरसून घ्यायचा. अशा पद्धतीने कोणतीही एक कृती जाणीवपूर्वक करायची. यामुळे आपण जे करतो आहोत त्यात राहू लागतो. वर्तमानाचा आनंद घेता येतो आणि विचारांचा वेग कमी होतो.
शांत बसून मनात येणारे विचार, प्रतिक्रिया न करता न्याहाळणे, बॉडी स्कॅन, सजग कृती या तंत्रांच्या सरावातील सातत्याने विचार हे मनातले तरंग आहेत हे भान येऊ लागते. ‘ऑल थॉट्स आर नॉट फॅक्ट्स’ याची जाणीव होऊ लागते. स्वतःला विचारांपासून वेगळे करता येण्याचे कौशल्य विकसित झाल्याने विचारांच्या रवंथानी होणारी मानसिक दमणूक, उद्भवणारा ताण कमी होतो. लक्ष देण्याचे कौशल्य विकसित होते. ‘सिलेक्टिव्ह अटेंशन’ वाढते. सजगता ध्यानमध्ये ज्यावेळी आपण विचार जाणत असतो त्यावेळी ‘प्री प्रंटल कॉर्टेक्स’ सक्रीय व्हायला मदत होत असते. श्वासाचा स्पर्श, संवेदना जाणण्याच्या सततच्या सरावाने ‘प्री प्रंटल कॉर्टेक्स’ला मेंदूतील इतर अवयवांशी जोडणारे तंतू अधिक दृढ होतात. प्री प्रंटल कॉर्टेक्समधील Anterior Cingulate cortex आणि insula सक्रीय होत असल्याने भावनिक हुशारी वाढायला याची मदत होते. एकंदरच मेंदूच्या या व्यायामाचे अर्थात साक्षी ध्यानाचे खूप फायदे आहेत. त्यामधे सातत्य ठेवत दैनंदिन जीवनाचा भाग म्हणून ते अंगीकारल्यास मानसिक आरोग्य सुदृढ राहायला निश्चितच मदत होईल हे मात्र खरे!
ऍड. सुमेधा संजीव देसाई