ऑनलाईन टीम
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी भागात काल, रविवारी शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण मिळाले. यातच काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनीही लखीमपूरला जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, आज पहाटे पोलिसांनी त्यांना सीतापूरमधील हरगाव येथून त्यांना ताब्यात घेतले.
दरम्यान, दुसरीकडे समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी देखील शेतकऱ्यांची भेट घेणार असल्याची घोषणा केल्यानंतर पोलिसांनी त्यांना स्थानबद्द करण्याचा प्रयत्न केला आहे. अखिलेश यांच्या निवासस्थानाबाहेर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अखिलेश यांना रोखण्यात आल्यानंतर त्यांनी घराबाहेर धरणे आंदोलन सुरु केले. त्यानंतर पोलिसांनी अखिलेश यादव यांना ताब्यात घेतले आहे. अखिलेश यादव लखनऊमध्ये त्यांच्या घराजवळ आंदोलनासाठी बसले होते. यावेळी हजरतगंज पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर शेकडो सपा समर्थक आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली. यानंतर अखिलेश यादव यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांच्या वाहनाला आग लावल्याची माहिती समोर आली आहे.
कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने गाडीखाली चिरडल्याचा आरोप होत असून, या हिंसाचारात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे लखीमपूरमधील वातावरण चांगलेच तापले आहे.