बससेवेवरून काँग्रेसचा सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला, धरणे आंदोलन : प्रश्नोत्तराचा तास सुरू असतानाच सभाध्यक्षांच्या आसनासमोर गदारोळ
प्रतिनिधी /बेळगाव
संपूर्ण राज्यात बससेवा कोलमडली आहे. कोरोनाच्या काळात बंद करण्यात आलेल्या बसेस अद्याप सुरू झाल्या नाहीत. बसपास असणाऱ्या मुलांना बसमध्ये घेतले जात नाही. अशा अनेक समस्यांनी संपूर्ण व्यवस्था ग्रासली आहे, असा आरोप करीत काँग्रेस व निजदच्या आमदारांनी बुधवारी विधानसभेत सभाध्यक्षांच्या आसनासमोर धरणे धरले. त्यामुळे दोनवेळा कामकाज तहकूब करावे लागले.
प्रश्नोत्तराच्या तासात तेरदाळचे आमदार सिद्धू सवदी यांनी तेरदाळ मतदारसंघातील बस समस्येबद्दल प्रश्न विचारला होता. परिवहनमंत्री बी. श्रीरामुलू यांनी त्यांना उत्तरही दिले. उपप्रश्न विचारतानाच काँग्रेस व निजदच्या आमदारांनी ही समस्या केवळ तेरदाळ मतदारसंघापुरती मर्यादित नाही. संपूर्ण राज्यात हीच स्थिती आहे. त्यामुळे या विषयावर विशेष चर्चेला अनुमती द्या, अशी मागणी केली.
आपल्या मतदारसंघात समस्या खूपच गंभीर आहेत, असे सांगत डॉ. रंगनाथ यांनी सभाध्यक्षांच्या आसनासमोर ठाण मांडले. त्यावेळी निजद व काँग्रेसचे इतर आमदारही आसनासमोर धावले. प्रश्नोत्तराचा तास सुरू असताना अशा पद्धतीने धरण्याला बसणे योग्य आहे का? असा सवाल सत्ताधाऱ्यांनी उपस्थित केला. त्यावेळी जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. सभाध्यक्षांच्या आसनावरून कुमार बंगारप्पा यांनी वारंवार विनंती करूनही धरणे सुरू राहिले. त्यामुळे भाजपचे आमदारही आक्रमक झाले. तेही आपल्या आसनावरून उठून पुढे आले.
बी. श्रीरामुलू यांनी दिलेले उत्तर समर्पक नाही. संपूर्ण राज्यात समस्या खूप मोठी आहे. त्यामुळे ही समस्या सोडविण्यासाठी विशेष चर्चेला अवकाश मागण्यात आला. माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे, आनंद न्यामगौडा, कृष्ण भैरेगौडा आदींनीही परिस्थितीत सुधारणा करण्याची मागणी केली. विशेष चर्चेला अनुमती दिली जाईल, असे सभाध्यक्षांनी सांगितल्यानंतरही गदारोळ सुरूच राहिला.
सभाध्यक्षांनी सांगितल्यानंतर सर्व आमदार आपल्या आसनावर परतले. मात्र, डॉ. रंगनाथ यांनी धरणे सुरूच ठेवले. त्यावेळी मंत्री कारजोळ त्यांच्यावर पार भडकले. प्रश्नोत्तराचा तास सुरू असताना सभाध्यक्षांच्या आसनासमोर उभे आहेत, आधी त्यांना बाहेर घालवा, असे सांगत त्यांनी चढ्या आवाजात ऐकवले. त्यामुळे गदारोळ वाढला. मंत्री माधुस्वामी यांनीही ही पद्धत योग्य नसल्याचे सांगताच काँग्रेसच्या आमदारांनी पुन्हा धरणे धरले.
खानापूरच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी सभाध्यक्षांच्या आसनासमोर उभे राहून मंत्र्यांविरुद्ध केलेल्या घोषणाबाजीमुळे आधी यांना सस्पेंड करा, अशी कायदा व संसदीय मंत्र्यांनी सभाध्यक्षांकडे मागणी करताच काँग्रेसच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे एकच गदारोळ उडाला. स्वत: विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनीही सभाध्यक्षांच्या आसनासमोर धाव घेतली. त्यावेळी कामकाज तहकूब करण्यात आले.
दुपारी 12.20 वाजता पुन्हा कामकाजाला सुरुवात झाली. त्यावेळी काँग्रेसने घोषणाबाजी तीव्र केली. सत्ताधाऱ्यांच्या प्रतिघोषणा सुरू झाल्या. कायदा व संसदीय व्यवहारमंत्री माधुस्वामी यांनी आपण सिद्धरामय्या यांच्याशी चर्चा केली आहे. धरणे मागे घ्या. हा विषय वाढविण्यात अर्थ नाही, असे आवाहन केले. सभाध्यक्षांनीही धरणे मागे घेण्याचे आवाहन केले.
विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या मात्र धरणे धरण्यावर ठाम होते. मंत्री शांत असले पाहिजेत. सभागृह चालविण्याची जबाबदारी सरकारवर असते. या सभागृहात आमदार व मंत्री या दोघांनाही समान हक्क आहेत. खरे तर बोलावून चर्चा करायला हवी होती. आमदारांना बाहेर काढा, चालते व्हा म्हणणे योग्य नाही. गोविंद कारजोळ यांनी खेद व्यक्त केला पाहिजे. त्याशिवाय आम्ही धरणे मागे घेणार नाही, अशी भूमिका जाहीर केली.त्यावेळी दोन्ही पक्षांच्या आमदारांत जोरदार घोषणाबाजी सुरू झाली.
गदारोळ वाढल्यामुळे पुन्हा तहकुबी
12.51 वाजता सभागृहात मुख्यमंत्र्यांचे आगमन झाले. धरणे मागे घेऊन कामकाजात भाग घेण्याचे त्यांनीही आवाहन केले. मात्र, मंत्र्यांची अरेरावी बरी नाही. आम्ही येथे चर्चेला आलो आहोत. आमच्यासोबत अरेरावी केली आहे. आमच्यावर हल्ला झाला आहे, तो आम्ही खपवून घेणार नाही, असे सांगितले. यावेळी सभागृहात याआधी काय काय घडले आहे, याची आपल्यालाही माहिती आहे. सभाध्यक्षांच्या आसनावरील माईक हिसकावून घेण्यात आला आहे, असे सांगितले. याचवेळी कायदा व संसदीय व्यवहारमंत्री माधुस्वामी यांनी आमदार अंजली निंबाळकर यांना निलंबित करा, अशी मागणी केली. आर. व्ही. देशपांडे यांच्यासह काँग्रेसच्या आमदारांनी आक्षेप घेतला. आजपर्यंत महिला सदस्यांवर निलंबनाची कारवाई झाली नाही, असे सांगितले. दुपारी 1 वाजता सभाध्यक्षांनी गदारोळ वाढल्यामुळे पुन्हा तहकुबी दिली.
बैठकीनंतर दोन्ही पक्षात समेट
सभाध्यक्षांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर दोन्ही पक्षात समेट झाला. 2.10 वाजता कामकाजाला सुरुवात झाली. लगेच तहकूब करून 3.15 वाजता भोजन विरामानंतर कामकाजाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे सभाध्यक्षांनी जाहीर केले. 3.45 वाजता भोजन विरामानंतर कामकाज सुरू झाले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी धरणे मागे घेण्याचे आवाहन केले. एकमेकांचा आदर करण्याची परंपरा आहे. हा विषय प्रतिष्ठेचा न करता धरणे मागे घ्या, असे सांगितले. विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, असे सांगत धरणे मागे घेतले. त्यानंतर प्रश्नोत्तराचा तास पुन्हा सुरू झाला.