क्षमायाचका करण्याची भाजपची मागणी, काँगेसचा नकार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
‘भारताच्या स्वातंत्र्यलढय़ात भाजपच्या लोकांच्या कुत्र्याचाही जीव गेला नव्हता, असे धक्कादायक आणि वादग्रस्त विधान काँगेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केल्याने भाजपमध्ये संतापाची लाट उसळली असून मंगळवारी या विधानाचा तीव्र निषेध संसदेत करण्यात आला आहे. खर्गे यांनी अवमानजनक विधान केले असून त्यांनी देशाकडे क्षमायाचना करावी, अशी मागणी भाजपने संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये केली. मात्र क्षमायाचनेस खर्ग यांनी नकार दिला.
राज्यसभेत त्यांनी आपल्या विधानाचे समर्थन केले. भाजपकडून कोणीही स्वातंत्र्य लढय़ात भाग घेतला नव्हता. हे माफी मागणारे लोक आहेत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी काँगेसच्या अनेकांनी बलिदान केले आहे. भाजपने स्वातंत्र्यलढय़ात भाग घेतलाच नव्हता, अशी विधाने खर्गे यांनी सोमवारी संसदेबाहेर केली होती.
संसदेत गदारोळ
संसदेत खर्गे यांच्या विधानांवर गदारोळ झाला. खर्गे यांची भाषा असभ्य असून त्यांनी अशी विधाने करावयास नको होती. या विधानांवरुन खर्गे आणि काँगेस यांची मनोभूमिका लक्षात येते. सत्ता हातातून गेल्याने काँगेस किती सैरभैर आणि निराश झाली आहे, हे त्यांच्या विधानावरुन जगाला समजले. भाजपच्या यशामुळे खर्गे व्यथित झाले असून त्यांच्या मनात आसूया आणि मत्सर निर्माण झाला आहे. त्यांचे नैराश्य त्यांच्या तोंडातून बाहेर पडले, अशी टीका केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केली. खर्गे यांनी भाजप, मतदार आणि देश यांची क्षमा मागावी अशी मागणीही त्यांनी केली. भाजपच्या अनेक नेत्यांनी खर्गेंवर टीका केली.
गांधींच्या विधानाची आठवण
स्वातंत्र्यानंतर काँगेस पक्ष विसर्जित झाला पाहिजे, या गांधीजींच्या विधानाची आठवण गोयल यांनी करुन दिली. गांधींजींचे विधान अक्षरशः खरे होते, हेच खर्गे यांच्या विधानांवरुन दिसून येते. काँगेसची अवस्था भविष्यकाळात काय होणार आहे आणि कोणत्या प्रकारचे नेते या पक्षाला मिळणार आहेत, याची जाणीव गांधीजींना झाली होती. त्यामुळेच त्यांनी काँगेस विसर्जित करण्याची सूचना केली होती. खर्गे काँगेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. कसे बोलावे एवढेही त्यांना कळत नाही. यातून काँगेस किती खालच्या स्तरावर पोहचली आहे हे समजते. काँगेसची सध्याची दयनीय अवस्था त्यांच्या विधानातून स्पष्ट होते, अशी टिप्पणी गोयल यांनी केली.
चीन मुद्दय़ावरुन सभात्याग
मंगळवारी पुन्हा चीनने अरुणाचल प्रदेशात केलेल्या घुसखोरीच्या प्रयत्नाचा मुद्दा संसदेत उपस्थित करण्यात आला. सोमवारी काँगेसने राज्यसभेत नियम 267 अंतर्गत चर्चेची मागणी केली होती. राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप ढंकर यांना अशा 9 नोटीसा प्राप्त झाल्या आहेत. मात्र त्यांनी ही मागणी फेटाळली. त्यामुळे विरोधी पक्षांच्या अनेक सदस्यांनी सभात्याग केला होता. मंगळवारही या मुद्दय़ाचे पडसाद उमटले होते. केंद्र सरकारने या संबंधात मागच्या आठवडय़ातच दोन्ही सभागृहांमध्ये वक्तव्य केले होते. एक इंचही भूमी चीनने नव्याने बळकाविलेली नाही, असे विधान सरकारच्या वतीने करण्यात आले होते. विरोध पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः निवेदन द्यावे, असा आग्रह दोन्ही सभागृहांमध्ये धरला होता.