UPSC 2021 परीक्षेमध्ये आणि त्यानंतर झालेल्या मुलाखतीमध्ये यश मिळवणाऱया एकूण विद्यार्थ्यांची संख्या आहे 685 त्यापैकी महाराष्ट्रातील विद्यार्थी आहेत 62. याचा अर्थ महाराष्ट्रासारख्या शिक्षणाच्याबाबतीत प्रगत असलेल्या राज्यामध्ये यशस्वी झालेले विद्यार्थी भारताच्या दहा टक्केसुद्धा नाहीत. गेल्या काही वर्षात यूपीएससी परीक्षेद्वारे सरकारी नोकरी मिळवण्यात यश मिळवणाऱयांची संख्या 100, 80 ते 62 अशी टप्प्याटप्प्याने कमी होत आहे. परीक्षेमध्ये पास होणाऱया विद्यार्थ्यांचे प्रमाण किती? भारतभर सर्वसाधारणपणे दहा लाखापेक्षा अधिक विद्यार्थी यूपीएससी परीक्षेचा फॉर्म भरतात. प्राथमिक परीक्षेनंतर त्यापैकी दहा टक्के विद्यार्थीच मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतात. या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन मुलाखतीला ज्याना बोलावले जाते त्यांची संख्या दोन हजाराच्या आसपास असते. म्हणजेच पाचशे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरल्यास त्यापैकी एकच विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र ठरतो. मुलाखतीमध्ये दोन किंवा तीन विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थी/विद्यार्थिनीची निवड होते. या आकडेवारीवरून अनेक निष्कर्ष काढता येतात. परंतु त्याची कारणमीमांसा करणे अधिक गरजेचे आहे.
महाराष्ट्रात मुंबई या महानगरापासून जितके लांब जाऊ तितके UPSC-MPSC परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढत जाते. पुण्यापेक्षा पुण्याजवळपासच्या लहान गावातील मुले-मुली वर्षानुवर्षे परीक्षा देत आहेत हे आढळते. शहराच्या जवळपासचे विद्यार्थी-विद्यार्थिनी परीक्षेसाठी क्लास लावणे, परीक्षेचा अभ्यास करणे, परीक्षा देणे अशा कारणासाठी पुणे-सातारा-कोल्हापूर-नागपूर सारख्या शहरात मुक्काम ठोकून असतात. अखिल महाराष्ट्रात नोकरी मिळण्याचे प्रमाण इतके कमी असूनही आणि दरवषी राज्यात 60 ते 100 विद्यार्थ्यांनाच सरकारी नोकरी मिळणार आहे हे माहित असूनही लाखो विद्यार्थी त्यासाठीच का प्रयत्न करतात? सरकारी नोकरीचे इतके अप्रूप का आहे? तंत्रज्ञानाच्या बाबतीत कोणतेही सरकारी कार्यालय खाजगी कार्यालयाच्या कित्येक मैल दूर आहे. तरीही सरकारी नोकरीचे वेड का आहे? गेली काही वर्षे पुण्याच्या जवळपासच्या छोटय़ा गावात/तालुक्मयाच्या गावातल्या शाळा-कॉलेजमध्ये व्याख्यानामध्ये हाच प्रश्न विचारतो. त्यावेळी मिळणारी उत्तरे फारच गमतीशीर असतात. ‘सरकारी नोकरीतून कधी काढून टाकत नाहीत’, ‘ती नोकरी सुरक्षित असते’, ‘तिथे पेन्शन मिळते’ अशा प्रकारची कारणे सांगितली जातात. परंतु हे अर्धसत्य आहे. कोणत्याही नोकरीमध्ये तुम्ही रोज नवे तंत्र, नवी कौशल्ये शिकत राहिलात तर तुमची नोकरी कुठेही सुरक्षित असते. स्पर्धेला घाबरून सरकारी नोकरी हा पर्याय निवडणे चूक आहे. लाल दिव्याची गाडी दाराशी असण्याचे वेड असणारे पालक आणि विद्यार्थी अनेक आहेत. अलीकडेच एका तालुक्मयाच्या गावात वर्ग घेत असताना एका विद्यार्थ्याने सांगितले की “सरकारी नोकरीमध्ये फुकट घर मिळते, म्हणून मला सरकारी अधिकारी व्हायचे आहे’’. यावर मी म्हणालो, “मला कुणीतरी फुकटात रहायला घर देत असेल तरी मी स्वतःच्या पगारामधून स्वतःचे घर बांधून त्यामध्ये राहीन, फुकटच्या घरामध्ये राहणार नाही.’’.
एक विद्यार्थिनी म्हणाली, “काही अधिकार हातात असणारी अधिकारी बनायचे आहे. सरकारी नोकरी असेल तर समाजात मान-सन्मान मिळतो.’’ त्या विद्यार्थ्याला मी म्हणालो, “मी 37 वर्षे बँकेत / बँकिंग, आय.टी. मध्ये घालवले. बँकेत काम करणाऱयांना पदोपदी अपमान सहन करावा लागतो की काय?’’ एक विद्यार्थी म्हणाला, “मला देशासाठी काम करायचे आहे.’’ यावर पुन्हा माझा प्रश्न होता, “बँकेत काम करणारे लोक दुसऱया कोणत्यातरी देशासाठी काम करतात का?’’ विनोदाचा भाग सोडून दिला, तरी देशाची सेवा करणारे सगळे भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरवर असतात, सगळेच पोलीस चोरांचा तपास करतात, नोकरी लागेपर्यंतच अभ्यास करावा लागतो, अशा विद्यार्थ्यांच्या काही ठाम पण चुकीच्या समजुती असतात. पालक अशा समजुती करून देण्यात मोलाचा वाटा उचलतात. ‘दारात लाल दिव्याची गाडी’, ‘समाजात मान-सन्मान’, ‘सरकारी बंगला’, ‘हाताखालच्या लोकांनी सॅल्युट ठोकायला हवा’ अशा अनेक समजुती पालक करून देत असतात. लहानपणापासून घरामध्ये हीच वाक्मये ऐकता ऐकता मोठी झालेली मुले पालकांनी बघितलेली स्वप्ने पूर्ण करण्यात वेळ वाया घालवतात. त्यामुळे करियर कशामध्ये घडवायचे आहे याचा निर्णय विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी मित्र-मैत्रिणी-पालक-नातेवाईकांच्या सल्ल्याने घेऊ नये. आपली आवड कशामध्ये आहे, आपल्या आवडीचे विषय कोणते आहेत, पुढील पाच वर्षे कोणत्या विषयांचा अभ्यास सलग 4 तास करणे आपल्याला जमणार आहे? या सर्वांचा साकल्याने विचार करून दहावी, बारावीनंतरचे निर्णय मुला-मुलीनी घ्यावेत. परंतु पालक आपल्या पाल्याचे बोट सोडत नाहीत. दहावीमध्ये शिकणारा मुलगा भाजी आणायला गेला तर कोणती भाजी विकत घ्यावी हा निर्णयसुद्धा पालक मुलाना घेऊ देत नाहीत. मुळात पालकांचे प्रशिक्षण होणे गरजेचे आहे. कोणतीही माहिती न घेता “वाटेल तेवढा खर्च करू, पण सरकारी अधिकारी होण्यासाठी UPSC-MPSC परीक्षा दे आणि आमचे स्वप्न पूर्ण कर’’ असे इमोशनल ब्लॅकमेलींग पालक करतात. पुण्यापासून 40 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापिकेने मला सांगितले की त्यांनी त्यांच्या मुलीला आय.टी. मधली नोकरी सोडून गावात परत बोलावले आहे आणि तिला MPSC चा अभ्यास करण्यास सांगितले आहे. ती मुलगी गेली 4 वर्षे गावामध्ये राहून आईच्या सांगण्यानुसार परीक्षा देत आहे. अशा मुख्याध्यापिका शाळेला लाभल्या असतील तर शाळेतील मुलांचे करियर भरकटलेले राहणार, यात शंका नाही.
स्पर्धा परीक्षांमध्ये पास होण्यासाठी क्लास लावणे हा एकच पर्याय विद्यार्थ्याना, पालकांना, शिक्षकाना माहित असतो. कोणताही क्लास लावल्यामुळे परीक्षेत यश मिळवता आले असते तर क्लास चालवणारे जिल्हाधिकारी झाले असते, परंतु विचार न करता पैसे खर्च करण्याची वृत्ती असल्यामुळे क्लासवाल्यांचे उद्योग जोरात सुरु आहेत. 2 तास क्लासमध्ये घालवले तरी रोज किमान चार तास वाचन, 2 तास लेखी परीक्षा सोडवणे आणि एक तास स्वतः सोडवलेले पेपर तपासणे ही अभ्यासाची पद्धत अवलंबणे गरजेचे आहे. परंतु बरेच विद्यार्थी बहु-पर्यायी प्रश्न वाचून सोडवतात जी सर्वात चुकीची पद्धत आहे. रोज चार विषयांचे प्रत्येकी 50 प्रश्न एका तासात सोडवल्यानंतर त्यामध्ये किती मार्क मिळतात याचे गेल्या तीन महिन्याचे रेकॉर्ड प्रत्येक उमेदवाराकडे तयार असावे. अशा स्पर्धा परीक्षेला बसणारे 80 टक्के उमेदवार चतुरस्त्र वाचन करत नाहीत. “मी यशस्वी कसा झालो’’ छाप पुस्तके वाचून स्पर्धा परीक्षेत यश मिळत नाही. टिळक पाच मार्काला, फुले सहा मार्काला आणि स्त्री-पुरुष समानता दोन मार्काला, असा अभ्यास करणारे कधीही यशस्वी होऊ शकत नाहीत. जिल्हाधिकारी होऊ इच्छिणाऱया विद्यार्थ्याना महाराष्ट्रातील किती जिह्यांची नावे सांगता येतात? खरे तर हा शालेय इतिहास-भूगोलाचा भाग आहे परंतु जिल्हाधिकारी होण्याचा विचार करण्यापूर्वी आपण किमान दहा जिह्यांची माहिती इंग्रजी आणि मराठीमध्ये किमान 200 शब्दात लिहू शकतो का, याचा तरी विचार करावा. अशा स्पर्धा परीक्षांमध्ये 2000 शब्दांचा निबंध काही मिनिटात लिहायचा असतो. त्यासाठी चतुरस्त्र वाचन, दोन्ही बाजूची मते वाचणे-समजून घेणे, मतमतांतरे, त्यावरील मुद्देसूद ठोस उत्तर देणे अशा पद्धतीने विचारांची जडणघडण होण्याची गरज आहे. परंतु नियोजनबद्ध प्रयत्न करणाऱया विद्यार्थ्यांची संख्या पाच टक्क्यापेक्षा कमी आहे. अपयश आल्यानंतर तो विद्यार्थी/विद्यार्थिनी वेगळय़ा पद्धतीने अभ्यास करण्याचे नियोजन करतो/करते का? बरेच विद्यार्थी वर्षानुवर्षे सी.ए. /आय.एम.एस. / एन.डी.ए. किंवा तत्सम परीक्षा देत असतात. याचा अर्थ ते एक पाउल मागे टाकून नव्या पद्धतीने अभ्यास कसा करावा याबद्दल विचारच करत नाहीत. UPSC/MPSC ची परीक्षा देणे गैर आहे असे नव्हे पण प्रत्येकाने बॅकअप प्लॅन तयार करावा. ‘फक्त एकच परीक्षा देईन’, ‘सरकारी नोकरी करेन’ असे स्वप्न बघण्यापेक्षा किमान पाच स्पर्धा परीक्षा देण्यासाठी प्रयत्न करावेत. 80 टक्के विद्यार्थ्यांचा प्लॅन बी तयार नसतो त्यामुळे हे विद्यार्थी पहिल्या अपयशाला “अनुभव मिळण्यासाठी पहिली परीक्षा दिली होती, पुढच्या वेळेपासून जोमात प्रयत्न करणार’’ अशी उत्तरे देतात. मिळेल ती नोकरी करून त्यानंतर रोज संध्याकाळी 2 तास स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणे हे ध्येय होऊ शकते. या परीक्षांमध्ये UPSC-MPSC-IPS-NDA सारख्या सरकारी नोकऱयांसाठी आवश्यक असणाऱया परीक्षा आणि बँक, इन्शुरन्स, खाजगी नोकऱया मिळण्यासाठीच्या सर्व परीक्षा देणे आणि बदलते तंत्रज्ञान शिकणे हे ध्येय ठरवावे.
बरेच मराठी विद्यार्थी / विद्यार्थिनी मुलाखतीमध्ये नापास होतात. त्याची कारणे व उपाय याविषयी पुढील लेखामध्ये.
-सुहास किर्लोस्कर