जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सवाल : ‘तरुण भारत’च्या वृत्तानंतर जिल्ह्यात युरीया शिल्लक असल्याचा कृषी विभागाचा दावा : प्रत्यक्ष कृषी दुकानात जाऊन वास्तव पाहण्याची गरज : निष्क्रिय कृषी विभागामुळे युरीया टंचाईची झळ
कृष्णात चौगले/कोल्हापूर
जिल्ह्यात युरियासह अन्य खतांचा पुरेसा साठा असल्याचा दावा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगिरे यांनी केला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून जिह्यात असलेल्या युरियाचा दुष्काळ आहे. याबाबत ‘युरीया टंचाईचे दुष्टचक्र कायम’ या आशयाचे वृत्त ‘तरुण भारत’मध्ये रविवारी प्रसिद्ध झाल्यानंतर पांगिरे यांनी तातडीने प्रसिद्धी पत्रक काढून जिल्ह्यात 2900 मेट्रिक टन युरिया वितरीत केला असल्याचे स्पष्ट केले आहे. पांगिरे यांनी ही कागदोपत्री माहिती दिली असली तरी त्यांनी जिह्यातील कृषी दुकानांमध्ये प्रत्यक्ष जाऊन पाहणी केल्यास युरिया टंचाईचे भिषण वास्तव त्यांच्यासमोर येईल. केवळ कार्यालयातून पत्रकबाजी करण्याऐवजी त्यांनी शेतकऱ्यांशी संपर्क साधल्यास नेमकी वस्तूस्थिती काय आहे हे समजेल.
पांगिरे यांच्या म्हणण्यानुसार जिल्हयात सद्यस्थितीमध्ये (4 सप्टेंबर) युरिया 14997 मे.टन, डीएपी 2405 मे.टन,एमओपी 2499 मे.टन, संयुक्त खते 14490 मे.टन व एसएसपी 5139 मे.टन अशी एकूण 39530 मे.टन खते उपलब्ध आहेत. तसेच, कृषि विभागाने महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ यांच्यामार्फत 2900 मे. टन युरिया, 531 मे. टन डीएपी बफर स्टॉक मधून वितरित केला आहे. ही माहिती त्यांनी अति आत्मविश्वासपूर्वक दिली असली तरी खत उपलब्धतेचे जिल्ह्यातील चित्र मात्र वेगळेच आहे. तसेच ‘रासायनिक खते उपलब्ध नाहीत’ अशा स्वरूपाच्या अफवांवर शेतकरी बांधवानी विश्वास ठेऊ नये असे आवाहनही पांगिरे यांनी केले आहे. पण युरीया खतासाठी दोन महिने कृषी दुकानांचे उंबरठे झिजवणाऱ्या शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या आवाहनावर विश्वास कसा ठेवायचा ? हा देखील एक प्रश्न आहे. तसेच जिल्ह्यातील कृषी विभाग जर डोळे उघडे ठेऊन कारभार करत असेल तर त्यांना हे पोकळ आवाहन करण्याची गरजच भासली नसती.
डांगोरा पिटू नका, युरिया द्या
रासायनिक खताची खरेदी करताना काही तक्रारी असतील तर संबधीत तालुका कृषि अधिकारी किंवा कृषि अधिकारी,पंचायत समिती यांचेकडे तक्रार नोंदवावी. शेतकऱ्यांनी तक्रारीसाठी राज्याच्या 18002334000 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. गरजेनुरुप तक्रार नोंदविण्यासाठी जिल्हास्तरावर 9049454649 किंवा 7385990593 या नंबरशी संपर्क साधावा अशी एक ना अनेक आवाहने कृषी विभागाकडून केली जात आहेत. कृषी विभागाकडून पारदर्शी कारभाराचा एवढा डांगोरा पिटला जात असेल तर त्यांनी केवळ तत्वज्ञान सांगू नये.
कृषी दुकानांमध्ये पुरेशा युरीया उपलब्ध करावा. आणि 2900 मे.टन युरीया जिह्यात वितरीत केल्याचे सांगितले जात असेल तर मग तो कृषी दुकानांऐवजी हातमिश्र खते तयार करणाऱ्या सहकारी संघात गेला काय ? असा प्रश्नही शेतकऱ्यांतून उपस्थित केला जात आहे.
कृषी मंडल अधिकाऱ्यांचा घ्यावा लागतोय शोध
शासनाच्या कृषी विकासाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे कृषी विभागाचे काम असते. स्थानिक पातळीवरील कृषी मंडल अधिकाऱ्यांकडून परीसरातील शेतकऱयांना मार्गदर्शन करणे अपेक्षित असते. पण अनेक ठिकाणी आपल्या भागातील कृषी मंडल अधिकारी कोण ? याचा शेतकऱ्यांना शोध घ्यावा लागत आहे. ठराविक गावातील पठडीतील शेतकरी पुढाऱ्यांना भेटले की काम झाले ? असा काही अधिकाऱयांचा मंडल अधिकाऱ्यांचा होरा आहे. त्यामुळे शासनाच्या योजना सर्व शेतकऱयांपर्यंत पोहोचत नसल्याचे चित्र आहे.