खानापूर तालुक्यातील नदी-नाल्यांच्या बाजूच्या जमिनीची धूप थांबवणारी योजना आखावी
प्रतिनिधी /खानापूर
खानापूर तालुक्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरात मोठे नुकसान झाले. महापुरामुळे झालेल्या नुकसानीला वेगवेगळी कारणे कारणीभूत असली तरी दरवर्षी नदी-नाल्यांच्या दोन्ही बाजूला असलेल्या जमिनीची होणारी वाढती धूप हे देखील त्यामागचे कारण आहे. यासाठी महापुरामुळे होणारे नुकसान टाळण्याचा एक प्रयत्न म्हणून नदी-नाल्याच्या दोन्ही बाजूला असलेली जमिनीची होणारी वाढती धूप रोखण्यासाठी उपाययोजना हाती घेणे अत्यंत गरजेचे आहे.
खानापूर तालुक्यातून वाहणाऱया मलप्रभा, म्हादई, मुंगेत्री, पांढरी आदी नद्यांसह त्यांना जोडणाऱया नाल्यांचा उगम जंगलभागात झाला आहे. त्यातच विशेषतः मलप्रभा नदीवर गेल्या दहा वर्षात कणकुंबीपासून तालुका हद्दीपर्यंत जवळपास 12 पूलवजा बंधारे बांधण्यात आले आहेत.
तसेच गेल्या दोन वर्षात जोरदार अतिवृष्टी झाली. यामुळे महापूर आला. साहजिकच या महापुरात नदी-नाल्यांच्या दोन्ही बाजूच्या जमिनीची धूप मोठय़ा प्रमाणात झाली आणि त्यामध्ये लावलेली जंगली झाडे किंवा इतर झाडे जमिनीच्या झालेल्या वाढत्या हानीमुळे तुटून मलप्रभा नदीपात्रात पडली व ती सर्व झाडेझुडूपे विविध बंधाऱयांत अडकल्यामुळे पाणी वाहून जाण्याचा मार्ग अडला गेला.
पाण्याचा मार्ग अडला गेल्याने नदी-नाल्यांचे पाणी मोठय़ा प्रमाणात पात्राबाहेर पडले. त्यामुळे जवळपासच्या दोन कि. मी. परिसरातील शेतीवाडीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. तर खानापूर शहराच्या काही नागरी वसाहतीमध्येही पाणी शिरल्याने अनेक घरांचे नुकसान झाले.
नदीकाठच्या दोन्ही बाजूनीं झाडे लावावीत
महापूर आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीला अनेक कारणे असावीत. पण नुकसान टाळण्यासाठी दोन्ही बाजूच्या जमिनीची धूप रोखणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी कणकुंबीपासून खानापूर तालुका हद्दीपर्यंत दोन्ही बाजूचे सर्वेक्षण करून नदीकाठावर दोन्ही बाजूला ठरावीक अंतरातील झाडे काढून टाकावीत आणि जमिनीची होणारी धूप रोखण्यासाठी जमिनीला घट्ट पकडणाऱया बच्यासारख्या झाडांची नदीकाठांच्या दोन्ही बाजूला लागवड करावी. बच्याची झाडे लावली आणि ती चांगल्याप्रकारे टिकविली तर त्यामुळे जमिनीची होणारी वाढती धूप थांबवता येऊ शकेल.
खानापूरला महामार्गावर मलप्रभा पुलाजवळ दामले यांची बाग आहे. या बागेत त्यांनी जमिनीची धूप रोखण्यासाठी आपल्या हद्दीत बच्याची झाडे फार पूर्वीपासून लावली आहेत. साहजिकच बच्याच्या झाडांमुळे त्यांच्या बागेतील जमीन ढासळू शकली नाही. याचे अनुकरण करून वनखाते, कृषी खाते, पाटबंधारे खाते या सर्वांनी एकत्र येऊन मलप्रभा नदीसह तालुक्यातील सर्व नदी-नाल्यांच्या काठावर बच्याची झाडे लावण्याची आणि टिकविण्याची योजना हाती घ्यावी. यासाठी नदीकाठावर असलेल्या शेतकऱयांचेही सहकार्य घ्यावे. यामुळे जमिनीची धूप रोखण्यासाठी एक मार्ग मिळू शकेल.