दहावीची परीक्षा नुकतीच झाली आणि दुसऱयाच दिवशी पुण्याजवळच्या एका गावातल्या शाळेतल्या मुलांबरोबर करियरविषयी गप्पा मारल्या, दहावीनंतर काय करणार, पदवी घेतल्यानंतर काय करता येईल, त्यासाठी आत्ता काय करायचे अशा प्रश्नांनी चर्चा सुरू केली. परीक्षा नुकतीच झाल्यामुळे काही विद्यार्थ्यांना या विषयावर लगेच विचार करण्याची इच्छा नव्हती. एका विद्यार्थ्याने B.Sc. (Agri) शिकल्यानंतर खताचे दुकान सुरू करण्याचा विचार असल्याचे सांगितले. त्याला विचारले, की खतांच्या दुकानात खताव्यतिरिक्त काय विकणार? यावर तो म्हणाला की खतांचे दुकान त्याने यापद्धतीने बघितलेले नाही. रोपांवर कीड लागल्यावर कोणती औषध फवारणी करावी, कोणत्या पिकाला कोणते खत वापरावे, ठिबक सिंचन म्हणजे काय, त्यासाठी आणि एकूणच शेतीसाठी कोणते साहित्य प्रत्येक शेतकऱयाकडे असावे, याची माहिती खताचा उद्योग सुरू करणाऱयास असणे गरजेचे आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्याला सुट्टीमध्ये कोणत्याही दुकानात स्वयंसेवक या नात्याने विनामोबदला काम करण्याचा सल्ला दिला. त्याक्षणी ती कल्पना त्याला पटली तरीही तो लगेच त्या अनुषंगाने प्रयत्न करेल याबद्दल मी साशंक आहे. एका विद्यार्थिनीने फॅशन डिझायनिंगमध्ये करियर करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर तिला पुढील दोन महिन्यात टेलरिंग शिकून घेण्यासाठी एका टेलरच्या हाताखाली काम करण्यास सांगितले. खरे तर, दहावीनंतरचे शिक्षण घेणाऱया सर्वच विद्यार्थ्यांनी-विद्यार्थिनींनी दोन महिन्यांच्या सुट्टीत कुठेही विनामोबदला काम करणे गरजेचे आहे, कारण अनुभव घेण्यास हीच खरी वेळ आहे.
याचा अर्थ आम्ही सुट्टीत मज्जा करायचीच नाही का, असा विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल तर त्यावर उत्तर हेच की परीक्षेनंतरचा एक आठवडा मनाप्रमाणे काहीही करण्यात किंवा काहीच न करण्यात घालवल्यानंतर पुढे काय करायचे याचे नियोजन करावे लागेलच. दुसऱया आठवडय़ापासून काहीच करायचे नाही, म्हणजे नेमके काय करायचे हे दोन-चार मित्र-मैत्रिणींनी एकत्र येऊन ठरवावे. ज्यांना काही उद्योग करण्याची इच्छा आहे, त्यांनी कोकणातले आंबे मागवून ते आपल्या गावात / शहरात विकण्याचे पर्याय शोधावेत. त्यासाठी कोकणात जाण्याची आवश्यकता नाही. जवळपासच्या घाऊक व्यापाऱयाकडून दहा डझन आंबे विकत घेऊन ते दहा जणांना विकले तरी वेगळा अनुभव मिळेल. असा काही ‘उद्योग’ प्रयोग स्वरूपात करण्यासाठी भांडवल किती लागेल, ते कोण देणार, मालाच्या दर्जाची हमी कशी मिळणार, विक्री कोणाला करावी, खरेदी किती करावी, किती रुपयास विकावी असे सर्व नियोजन दोन-तीन मित्र-मैत्रिणींनी मिळून करावे.
शहरात राहणाऱया विद्यार्थी/विद्यार्थिनींनी आपल्या ओळखीपलीकडचे शहर सिटी बसमधून प्रवास करून बघावे. बसमधून प्रवास करताना सोबत नोंदवही-पेन नेहेमीच बरोबर असावे. आजूबाजूला दिसणाऱया दुकानांचे वैविध्य लक्षपूर्वक बघितल्यास उद्योग सुरू करण्याच्या अनेक कल्पना सुचतील, त्याची नोंद करावी. प्रवासामध्ये अनेक अनोळखी माणसे भेटतील, त्यांची ओळख करून घ्या, त्यांच्या व्यवसाय/नोकरीबद्दल काही प्रश्न विचारा. गावातल्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने शेती कशी करतात, याबद्दल माहिती घ्यावी, झिरो बजेट फार्मिंग म्हणजे काय, ऑरगॅनिक फार्मिंग कसे करतात हे प्रत्यक्ष त्या शेतामध्ये जाऊन बघावे. असे अनुभव घेणे शहरामध्ये शक्य नाही पण गावातील मुले सहज करू शकतात. गावामध्ये करियर करू इच्छिणाऱया मुलांनी शेतमालाचा भाव कसा ठरवतात, कोठे ठरवतात, जवळपासच्या गावातले मार्केट यार्ड (कृषी उत्पन्न बाजार समिती) काय असते, तिथे घाऊक भाजी-फळे यांची विक्री कशी करतात हे सर्व तिथे पहाटे जाऊन बघता येईल. एम्प्रेस गार्डन (पुणे), टाऊन हॉल (कोल्हापूर), जिजाबाई उद्यान (मुंबई) अशा ठिकाणी सकाळी भेट देऊन तिथल्या झाडांची माहिती गाईडच्या मदतीने घ्यावी. पानावरुन झाडांची नावे ओळखण्याचे कौशल्य आत्मसात करता येईल. झाडाच्या बिया गोळा करणे, उन्हाळ्यात येणाऱया फुलांचे वैविध्य वैशिष्टय़ांसह जाणून घेणे, कोणत्या झाडावर कोणते पक्षी बसतात याच्या नोंदी घेणे, असे बरेच उद्योग भटकंतीला जोड देऊन करता येतील.
सर्वच मुलांनी जवळपासच्या एखाद्या कारखान्याला भेट देऊन तिथले सर्व काम बारकाईने पहावे. वृत्तपत्र छपाई असो वा जॅम/ब्रेड तयार करण्याचा उद्योग, जवळून बघता बघता प्रश्न विचारावे. फारच कमी शाळांमध्ये प्रश्न विचारण्यास प्रोत्साहन दिले जाते. शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रश्न विचारण्याचे प्रमाण वाढायला हवे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्याला ज्या क्षेत्रात करियर करण्याची इच्छा आहे, त्या क्षेत्रात किमान पाच वर्षांचा अनुभव असणाऱया चार-पाच व्यक्तींची समक्ष भेट घेऊन प्रश्न विचारावे. ज्यांना बँकेत नोकरी करण्याची इच्छा आहे, त्यांनी किमान पाच बँकांमध्ये जाऊन तिथल्या विविध योजनांची माहितीपत्रके मिळवावीत. शैक्षणिक कर्ज कोणास मिळू शकते, किती मिळू शकते, त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतात असे अनेक प्रश्न विचारावेत आणि त्याच्या माहितीपत्रकाचे तपशिलात जाऊन वाचन करावे. ज्यांना पोलीस होण्याची इच्छा आहे, त्यांनी पोलिसांची समक्ष भेट घेऊन त्यांना त्यांच्या त्या क्षेत्राबद्दल, त्यांच्या दिनक्रमाबद्दल माहिती घ्यावी. ज्यांना कॉम्प्युटर इंजिनिअर होण्याची इच्छा आहे त्यांनी या क्षेत्रात किमान दहा वर्षे अनुभव असणाऱयास पुढील दहा वर्षात या क्षेत्रात काय बदल होतील यासारखे प्रश्न विचारावेत. डॉक्टर किंवा मेडिकल या क्षेत्रामध्ये ज्यांना करियर करण्यात विशेष उत्सुकता आहे, त्यांनी जवळपासच्या मोठय़ा हॉस्पिटलला भेट द्यावी. हॉस्पिटलमधले विविध बोर्ड वाचून विशेष कौशल्य असणारे डॉक्टर किती प्रकारचे आहेत त्यांची नोंद करता येईल. औषधाच्या दुकानात स्वयंसेवक या नात्याने विनामोबदला काम करण्याची तयारी ठेवावी. जवळपासचे अनेक दुकानदार तुमची नोंद घेण्याची सवय बघून त्यातील माहिती देऊ शकतील.
सायन्स हा विषय न आवडण्याचे एक कारण म्हणजे आपण सायन्स पुस्तकाच्या बाहेर आहे, असे मान्यच करत नाही. स्वयंपाकघरातही सायन्स आहे. दही कसे लावावे, दही लावणे आणि पनीर तयार करणे यात फरक काय आहे, मटकीचे मोड कसे आणावे, हे सर्व स्वतःच्या हाताने करून पहावे. स्वयंपाक ही कला विशेषतः मुलांनी शिकून घ्यावी. नाश्ता-जेवणातील भाज्या-कोशिंबीर यामधील किमान चार प्रकार स्वतंत्रपणे म्हणजे कोणाचीही मदत न घेता करता आले तर पुढील आयुष्यात स्वावलंबी होता येईल हा एक भाग झाला. शिवाय रोजच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेली ही कला शिकून घेणे आपलेच आयुष्य समृद्ध करते. स्वयंपाक करणे हे सर्वात सृजनशील काम आहे. त्यामुळे एखादा पदार्थ शिकल्यानंतर त्यामध्ये स्वतःच्या कल्पनेप्रमाणे त्यामध्ये काही बदल करावेत. चपात्या/पोळ्य़ा करण्यासाठी गव्हाचे पीठ मळताना पिठात पाणी घालण्यास आपल्याला शिकवले असेल तर एक दिवस पाण्यात तेल-मीठ घालून ते पाणी ढवळल्यानंतर त्यामध्ये गव्हाचे पीठ मिसळण्याच्या नवीन पद्धतीने तुम्ही कणिक मळू शकता. असे नवीन प्रयोग आपल्याला नवे काही देऊन जातात. सुट्टीत अभ्यास करायचा नसतो याचा अर्थ वाचन करणे सोडून द्यायचे असा नाही. प्रत्येकाने रोज किमान दोन तास वाचन करणे गरजेचे आहे. कथा, कादंबरी, आत्मचरित्र, चरित्र, ललित लेखन, वृत्तपत्रांमधील संपादकीय, मासिकामधील लेख असे बरेच काही वाचन मराठी आणि इंग्रजीमध्ये नियमितपणे करावे. एका तासात किती पाने वाचून होतात, याची रोज नोंद ठेवून वाचनाचा वेग वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. आपले ज्यामध्ये प्राविण्य आहे किंवा ज्या खेळाचे नियम आपल्याला माहीत असतात, तेच खेळ आपण खेळतो उदा. क्रिकेट. याचे पुढचे पाऊल म्हणजे नवे खेळ शिकणे. फुटबॉल, टेनिस, बॅडमिंटन, बुद्धिबळपासून डंबशेराडस्, मोनॉपॉली, कटान, डॉबल असे अनेक गेम्स त्यामधील नियमांच्या बारकाव्यांसह शिकून घ्यावेत. अलीकडे शहरात आर्थिकस्तरानुसार वेगवेगळ्या शाळेत प्रवेश घेतला जातो. त्यामुळे सोसायटीमधील मुले त्याच किंवा इतर सोसायटीमधील मुला-मुलींशी खेळतात. हे बंधन तोडून सोसायटीमधील मुलांनी जवळच्या वस्तीतील मुलांच्या खेळात सहभागी व्हावे.
गाणी आपण नेहेमीच ऐकतो, सुट्टीमध्ये हीच गाणी वेगळ्या पद्धतीने ऐकता येतील. गाण्यातल्या कवितेच्या शब्दांकडे आतापर्यंत लक्ष गेले नसेल तर शब्दांचा अर्थ समजून ऐकावे, त्याचे शूटिंग कसे केले आहे हे तपशिलात जाऊन बघता येईल. गाण्यात कोणकोणती वाद्ये वाजली आहेत याकडे कान देता येईल. सुट्टीमध्ये दर्जेदार चित्रपट बघावेत. चित्रपट कसे बघावे, कोणते बघावे आणि का बघावे याबद्दल पुढील लेखामध्ये.
-सुहास किर्लोस्कर