मृत्यूदर रोखण्यासाठी प्रयत्न, संपूर्ण लसीकरणावर भर
सोलापूर प्रतिनिधी
लम्पी आजाराने पशुपालकांमध्ये चिंता निर्माण केली होती. इतर राज्यातील परिस्थितीचा विचार करून वेळीच सावध होऊन राज्य शासनाने लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. राज्यातील 82 टक्के जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले असून संपूर्ण लसीकरण करण्यावर भर राहणार असल्याची माहिती महसूल, दुग्धविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितली.
पालकमंत्री नियुक्ती झालेले राधाकृष्ण विखे-पाटील हे पहिल्यांदाच सोलापुरात आले होते. सात रस्ता परिसरातील नियोजन भवन येथे त्यांनी विविध विभागाची आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हा नियोजन समितीची देखील बैठक पालकमंत्री विखे-पाटील यांनी घेतली. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी लम्पी या जनावरांच्या आजाराबाबत माहिती दिली.
सुरुवातीच्या काळामध्ये राजस्थानमध्ये लम्पीबाधित जनावरांची संख्या मोठी होती. या राज्यामध्ये जवळपास 60 हजार जनावरे ही लम्पी आजाराने मृत्यू पडली. हा अनुभव लक्षात घेऊन राज्य सरकारने वेळीच याचे नियोजन केले. महाराष्ट्रामध्ये साधारण दीड हजार जनावरे ही लम्पी आजाराने दगावली आहेत. राज्यातील जनावरांचा मृत्यूदर रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. नुकसानग्रस्त पशुपालकांना मदत दिली आहे. याबरोबर जनावरांचे शंभर टक्के लसीकरण करण्याचे प्रयत्न राहणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करू
सोलापूरची विमानसेवा सुरू करण्याचा प्रश्न हा बऱयाच कालावधीपासून प्रलंबित पडला आहे. वास्तविक आतापर्यंत सोलापूरची विमानसेवा सुरू होणे अपेक्षित होते पण तसे झालेले नाही. बोरामणी हे आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू करण्यासाठी वन विभागाच्या केंद्रीय स्तरावरील समितीच्या मंजुरीची गरज आहे. याबाबत प्रयत्न करून सोलापूरच्या विमानसेवेचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची भूमिका देखील पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मांडली.