गेल्या कित्येक महिन्यांपासून रस्त्यांच्या डांबरीकरणाचे घोंगडे भिजत
बेळगाव : स्मार्ट सिटी योजनेंतर्गत अनेक रस्त्यांचा विकास करण्यात आला. मात्र महत्त्वाच्या व वर्दळीच्या रस्त्यांच्या विकासाकडे महापालिकेसह स्मार्ट सिटी कंपनीचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळेच वडगाव-येळ्ळूर रोडच्या विकासाचे घोंगडे भिजत पडले आहे. रस्त्यांची दुरवस्था झाल्याने रहिवाशांसह वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यांच्या विकासाच्या नावाखाली काही महिन्यांपूर्वी रेणुका हॉटेल ते नाझर पॅम्पपर्यंतचा रस्ता खोदला होता. त्यानंतर जलवाहिन्या घालण्यासाठी रस्त्यांच्या विकासाचे काम थांबविण्यात आले. जलवाहिन्या घातल्यानंतरही काही महिने हा रस्ता दुर्लक्षित राहिला. आता गॅसवाहिन्या घालण्यासाठी रस्त्याचे काम थांबविण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. सध्या गॅसवाहिन्या घालण्याचे काम सुरू आहे. पण ही कामे कधी पूर्ण होणार आणि रस्त्यांचे डांबरीकरण कधी होणार, असा प्रश्न येथील रहिवासी उपस्थित करीत आहेत.
गेल्या सहा महिन्यांपासून या रस्त्यावर कोणत्या ना कोणत्या कारणासाठी खोदाईसत्र सुरू आहे. परिणामी संपूर्ण रस्त्यावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याचा फटका स्थानिकांना बसत आहे. मागील वषी या रस्त्यावर ख•s निर्माण झाल्याने वाहनधारकांना ये-जा करणे मुश्कील बनले होते. मोठमोठ्या ख•dयांमध्ये पावसाचे पाणी साचून राहिल्याने ये-जा कशी करायची, असा प्रश्न वाहनधारकांना भेडसावत होता. या ठिकाणी अनेक लहान-मोठे अपघात झाले आहेत. या रस्त्याचा विकास कधी होणार? असा प्रश्न उपस्थित करून महापालिकेकडे सातत्याने तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्या तक्रारींची दखल घेऊन रस्त्याची खोदाई करण्यात आली. त्यानंतर खडीही घालण्यात आली, पण सहा महिन्यांनंतरही रस्त्याचा विकास झाला नाही. अर्धवट राहिलेल्या रस्त्याचा विकास करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे