प्रा. बी. ई. रंगास्वामी यांचे प्रतिपादन : राणी पार्वती देवी कॉलेजमध्ये वार्षिकोत्सव
प्रतिनिधी /बेळगाव
मूल्याधिष्ठित शिक्षण ही काळाची गरज आहे. सर्व प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देण्याची क्षमता त्यामध्ये आहे. बसवाण्णा, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कुवेंपु, विश्वेश्वरय्या हे महामानव आपले आदर्श आहेत. खरा माणूस घडविणे हेच शिक्षणाचे अंतिम ध्येय आहे. जागतिकदृष्टय़ा सर्वसमावेशक आणि सामाजिकदृष्टय़ा जबाबदार नागरिक घडविणे हा शिक्षणाचा उद्देश आहे. या साऱया प्रवासात आत्मविश्वास निर्णायक भूमिका निभावणार आहे. जय जवान, जय किसान, जय विज्ञान याचसोबत जय अनुसंधान ही काळाची गरज बनली असल्याचे प्रतिपादन विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचे मूल्यमापन विभागाचे रजिस्ट्रार प्रा. बी. ई. रंगास्वामी यांनी केले.
एसकेई सोसायटी संचलित राणी पार्वती देवी कॉलेज ऑफ आर्ट्स ऍण्ड कॉमर्स आयोजित वार्षिकोत्सव आणि वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. आरपीडी कॉलेज मॅनेजमेंट कमिटीच्या व्हा. चेअरमन प्रा. माधुरी शानभाग कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. लता कित्तूर याही उपस्थित होत्या.
प्रा. शानभाग म्हणाल्या, एखाद्या घटनेविषयी प्रश्न पडणे हाच भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. बौद्धिक शक्ती हीच साऱया प्रश्नांना समर्पक उत्तरे सूचवू शकते. प्रारंभी नुपूर रानडे हिने कार्यक्रमाची सुरुवात केली. प्राचार्या डॉ. अनुजा नाईक यांनी स्वागत केले. पूजा पाटील यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. प्रा. प्रसन्ना जोशी यांनी स्टुडंट कौन्सिलचा रिपोर्ट सादर केला. प्रा. पूनम काडापुरे यांनी पारितोषिक विजेत्यांची नावे घोषित केली. प्रा. डॉ. शर्मिला संभाजी यांनी आभार मानले. डॉ. रामकृष्ण एन. यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.