मानवी जीवनाला प्रेमाची अखंड भूक आहे. प्रेम माणूसपण वृद्धिंगत करते. परस्परांचा दुस्वास किंवा हेव्यादाव्यातून फक्त संघर्ष वाढत राहतो. आव्हान आणि प्रतिआव्हानांच्या भाषेतून माणूस घायाळ होतो. क्रौर्य आणि दमन टाळून सारा मानवी समाज एकसंध राहणे ही काळाची गरज आहे. उदगीरमध्ये पार पडलेल्या विद्रोही साहित्य संमेलनातून मानवी जीवनमूल्यांचे वर्धन होण्याच्या दृष्टीने विचार व्यक्त केले आहेत, हे महत्त्वाचे आहेत. वचन साहित्यातून मानवधर्माचा उद्गार काढणारे महात्मा बसवेश्वर यांचे नाव विद्रोही संमेलन परिसराला देण्यात आले होते, ही औचित्यपूर्ण बाब होती. महात्मा बसवण्णांनी जातधर्म आणि वर्णव्यवस्थेवर प्रहार केले आहेत. कर्नाटक सीमेवर असलेल्या उदगीरमध्ये मराठीबरोबरच कन्नड, उर्दू, हिंदी, तेलुगु भाषा बोलणारे लोक मोठय़ा संख्येने आहेत. ही बहुभाषिकता मानवी जीवनातील वैविध्याचे दर्शन घडवणारी आहे. संमेलनाचे अध्यक्ष कवी गणेश विसपुते यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामधून मानवी मूल्यांची पुर्नस्थापना व्हायला हवी. देशात राहणाऱया सगळय़ा समाजाचे कल्याण करणारा राज्य कारभार झाला पाहिजे, क्रूरता नष्ट झाली पाहिजे असा संयत विचार मांडला. कोणत्याही दमनकारी व्यवस्थेविरुद्ध निर्भिडपणे उभे राहून आपले विचार स्पष्टपणे मांडणे महत्त्वाचे असते. सामाजिक न्यायासाठी ती आवश्यक गोष्ट असते. आततायीपणा, आक्रस्ताळेपणा आणि अभिनिवेशाने काहीही साध्य होत नाही, उलट संयमाने हवा तो परिणाम साधता येतो, हेच श्री. विसपुते यांच्या भाषणाने दाखवून दिले आहे. विद्रोह आणि द्रोह यात फरक आहे. विद्रोहामुळे विलापाची वेळ येत नाही, उलट न्यूनत्व भरून निघते. समग्र जीवनव्यवहार आणि समता प्रस्थापित होण्यासाठी मदत होते. महात्मा फुले यांनी ग्रंथकारांच्या संमेलनाची ‘घालमोडय़ा दादां’चे संमेलन अशा शब्दात संभावना केली होती. त्याला कित्येक दशके झाली. मात्र परिस्थितीत गुणात्मक बदल घडून आल्याचे आढळत नाही. उलट विखार वाढत चालल्याचे दिसून येते. त्याचा फायदा राजकीय नेते उठवणार यात शंका नाही. स्वतःला राजकारण्यांच्या हातातील बाहुले होऊ द्यायचे नाही हा विद्रोही साहित्य संमेलनाचा कटाक्ष पहिल्या दिवसापासून आहे. म्हणूनच ‘एक मूठ धान्य आणि एक रूपया’ अशी सम्यकदान मोहीम संमेलन आयोजक दरवेळी राबवतात. कोणातरी धनवंताकडून किंवा राजकारण्यांकडून लाखो रुपयांचा निधी घेऊन त्यातून संमेलन घडवून आणणे आजपर्यंत टाळले आहे. सम्यकदान हे सर्वसमावेशकतेचे प्रतीक आहे. संमेलनाचे उद्घाटन अशाच प्रतीकात्मक रीतीने झाले. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि स्त्री अशी मडक्मयांची उतरंड सय्यद सरवर चिश्ती यांच्या हस्ते फोडण्यात आली. श्री. चिश्ती हे सुफी संत परंपरेचे अभ्यासक आहेत. ही उतरंड, ही वर्णव्यवस्था माणसाच्या प्रगतीतील, समतेतील अडथळा आहे. अशा दमनकारी व्यवस्थेचे उच्चाटन कायमस्वरूपी व्हावे, हा हेतू मडके फोडण्याच्या कृतीमागे होता. पुरूषसत्ताक पद्धतीतून हिंसेचा जन्म होतो. स्त्रीचे शोषण होते. महिलांवर घराबाहेर अत्याचार किंवा हिंसा होते असे नाही तर कुटुंबातही तिला हिंसेला तोंड द्यावे लागते. तिला सक्षम बनवण्याचा विचार या संमेलनातून मांडण्यात आला. विद्यमान राजकीय व्यवस्थेतील दोष आणि एकाधिकारशाही माणसाला एकमेकांपासून तोडत आहे. माध्यमे एकांगी झाल्यामुळे हुकुमशाही प्रवृत्ती फोफावत आहे. हा माध्यमऱहास पाहिला तर विद्रोही चळवळीने समाजमाध्यम (सोशलमीडिया) हातात घेतले पाहिजे, त्याच्या प्रभावी वापरातून आपले विचार जनमानसावर बिंबवले पाहिजेत, असा सूर या संमेलनात निघाला. जातनिहाय जनगणना, नास्तिकता, शेतीतील प्रश्न यावर सखोल चर्चा झाली. ‘विषमतेला नकार, समतेला होकार’ हे संमेलनाचे ब्रीद होते. या साहित्य संमेलनात केंद्र सरकारच्या विविध धोरणांना विरोध करण्यात आला. त्याविषयीची आपली राजकीय भूमिका स्पष्ट करण्यात आली. हिजाबचे राजकारण असो किंवा तत्सम कोणतीही कृती विषमता प्रस्थापित करणारी आहे. भारतीय राज्यघटना बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यातून बहुजनांचे मोठे नुकसान होईल, असा इशारा देण्यात आला. सनातनवादाला विरोध आणि संविधानाचे समर्थन हा विद्रोही हुंकार आहे, असे अनेक विचारवंतांनी स्पष्ट केले. ‘कितीही येवोत द्रोणाचार्य, दान अंगठय़ाचे देणार नाही’, हा निर्धार व्यक्त करण्यात आला. एक मात्र खरे की प्रस्थापितांचे 95 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन आणि विद्रोही साहित्य संमेलन यांच्यात फक्त वैचारिक फरक आहे. संमेलनाच्या कार्यक्रम पद्धतीत मात्र कमालीचे साम्य आहे. प्रस्थापितांच्या साहित्य संमेलनात ‘शोभायात्रा’ काढण्यात आली, विद्रोहींनी ‘विचार फेरी’ काढली. शोभायात्रा ‘छत्रपती शिवाजी महाराजां’च्या पुतळय़ापासून सुरू झाली, विचारफेरी ‘साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळय़ा’पासून सुरू झाली. उद्घाटन दीपप्रज्वलनाऐवजी मडक्मयांची उतरंड फोडून झाले. बाकी परिसंवाद, काव्यसंमेलन असे कार्यक्रम समानच होते, फक्त त्यांचे विषय वेगळे होते. अजय-अतुलच्या संगीत रजनीऐवजी रॅपगीत गायनाचा कार्यक्रम झाला. अध्यक्षीय भाषण, समारोपाला ‘सेलिब्रिटी’ पाहुणा अशी समानता दिसून आली. चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि वृत्तवाहिनी संपादक रवीशकुमार समारोपाचे पाहुणे होते. रवीश यांनी ऑनलाईन संदेश दिला. तिकडे राष्ट्रपती कोविंद समारोपाचे पाहुणे होते, त्यांनीही ऑनलाईन संदेश दिला. संमेलन झाल्यानंतर वर्षभर विद्रोही विचारांच्या आणि समतेच्या प्रस्थापनेसाठी काय करणार ते जाहीर करून त्याची अंमलबजावणी करणे महत्त्वाचे आहे. विद्रोही संमेलनातून मूल्यवर्धनाचे काम होत आहे, ही समाधानाची बाब आहे. विरोधासाठी विरोध हे सूत्र न राहता सर्व प्रकारच्या दमनाला, भोंदूपणाला विरोध व्हायला हवा. हा विचार पुढे नेणारे साहित्यिक, कवी निर्माण व्हायला हवेत. संमेलनातील प्रतीकात्मकता कमी करून सर्जकता वाढणे गरजेचे आहे. विद्रोही संमेलनातून नवनिर्माणाचे प्रतिध्वनी अव्याहत निनादत राहिले पाहिजेत.
Previous Articleकाळ्य़ा समुद्राच्या 80 टक्के क्षेत्रावर रशियाचा कब्जा
Next Article ब्राझीलमधील डेफ ऑलिम्पिकसाठी सातारची प्रांजली रवाना
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.