प्रतिनिधी /पणजी
अखिल भारतीय महिला परिषदेच्या गोवा शाखेतर्फे नुकताच वनमहोत्सव साजरा करण्यात आला. पर्वरी येथील परिषदेच्या महिला हॉस्टेलच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात बाल आणि महिला कल्याण खात्याच्या संचालिका दिपाली नाईक प्रमुख सन्माननीय पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
महिला परिषदेच्या अध्यक्षा पिती शेटय़े यांनी स्वागतपर भाषण केले. वनमहोत्सव दरवर्षी साजरा करणे हे आम्हा सर्वांचे कर्तव्य आहे, असे सांगून दिपाली नाईक यांनी वरील संस्थेतर्फे आयोजित होणाऱया विविध प्रकल्पांबद्दल कौतुक केले.
बागकाम हा छंद आत्मसात करून सर्वांनीच पर्यावरणाचे जतन करण्याचा पुढाकार घ्यावा. आपल्याला जगण्यासाठी झाडांची अत्यंत गरज असते. अन्न वस्त्र प्राणवायू पाणी निवारा या सर्व गोष्टी आपल्याला झाडांमुळेच मिळतात. झाडांमुळे जमिनीची धूप थांबते. त्यामुळे झाडे लावा आणि ती प्रेमाने वाढवा, असा सल्ला बागकामप्रेमी अमिता नायक सलत्री यांनी दिला.
दोन्ही मान्यवरांच्या हस्ते विविध रोपटी लावण्यात आली. संस्थेच्या खजिनदार दिपा खेर यांनी सूत्रसंचालन केले तर सचिव स्मिता कारेकर यांनी आभार मानले. यावेळी सर्व महिलांनी वुमन हॉस्टेलच्या आवारात रोपटी लावली.