अहमदाबाद ते मुंबई अवघ्या पाच तासात ः 52 सेकंदात घेतला 0 ते 100 किमी प्रतितास वेग
अहमदाबाद / वृत्तसंस्था
देशातील पहिल्या सेमी-हायस्पीड आणि नवीन वंदे भारत रेल्वेने चाचणीदरम्यान एक नवा विक्रम केला आहे. बुलेट टेनला मागे टाकत या नव्या रेल्वेने 52 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग पकडल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी दिली. देशातील ही तिसरी वंदे भारत रेल्वे असून ती अहमदाबाद-मुंबई मार्गावर चालवली जात आहे.
वंदे भारत रेल्वेची तिसरी चाचणी नुकतीच झाली. यावेळी 0 ते 100 किमी प्रतितास प्राप्त करण्यासाठी 52 सेकंद लागले. तर बुलेट टेनला हा वेग गाठण्यासाठी 54.6 सेकंद लागले. नवीन रेल्वेचा कमाल वेग ताशी 180 किमी आहे. यापूर्वीच्या वंदे भारत रेल्वेचा कमाल वेग 160 किमी प्रतितास आहे.
शताब्दीच्या तुलनेत भरधाव
शुक्रवारी अहमदाबाद-मुंबई दरम्यान नवीन वंदे भारत रेल्वेची चाचणी घेण्यात आली. ही रेल्वे अहमदाबादहून सुरतला अवघ्या 2 तास 32 मिनिटांत पोहोचली. या मार्गावर शताब्दी एक्स्प्रेसला तीन तास लागतात. अहमदाबादहून सकाळी 7.06 वाजता निघालेली नवीन वंदे भारत रेल्वे सकाळी 9.38 वाजता सुरत स्थानकात पोहोचले. तर 12.16 ला मुंबई सेंट्रलला दाखल झाली. अहमदाबाद ते मुंबई 492 किमी अंतर कापण्यासाठी रेल्वेला फक्त 5 तास 10 मिनिटे लागली. तर शताब्दी एक्स्प्रेसला अहमदाबादहून मुंबई सेंट्रलला पोहोचण्यासाठी 6 तास 20 मिनिटे लागतात.
विमानाप्रमाणे सुविधा
वंदे भारत रेल्वेमध्ये विमानाप्रमाणे सोयीöसुविधा असणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले. वंदे भारत पूर्णपणे मेड इन इंडिया आहे. या रेल्वेमध्ये एसी, टीव्ही, ऑटोमॅटिक दरवाजे, हायक्लास पॅन्ट्री आणि वॉशरूम आहेत. तसेच एक्स्प्रेसच्या नवीन डिझाईनमध्ये फोटोकॅटॅलिटिक एअर प्युरिफायर सिस्टम असून त्याद्वारे 99 टक्के जंतू आणि विषाणू नष्ट होतात.
दर्जा-निर्देशांकात अव्वल
नवीन रेल्वेने दर्जा आणि प्रवासी निर्देशांक सुधारला आहे. या पॅरामीटर्सवर रेल्वेचा स्कोअर 3.2 आहे, तर जागतिक स्तरावर सर्वोत्तम स्कोअर 2.9 आहे. टेनमध्ये सेल्फ-प्रोपेल्ड इंजिन असल्यामुळे वेगळे इंजिन जोडावे लागणार नाही. एक्झिक्मयुटिव्ह कोच सीट्स व्हिस्टाडोम सीट्सप्रमाणे 180 डिग्रीपर्यंत फिरवता येतात. ऑक्टोबरपासून वंदे भारत गाडय़ांच्या नवीन बॅच प्रत्येक महिन्यात दाखल होणार आहेत.