वडपूजनासाठी महिलांची एकच गर्दी
प्रतिनिधी /बेळगाव
शहरात आणि तालुक्मयामध्ये वटपौर्णिमेचे व्रत महिलांनी मोठय़ा भक्तिभावाने आचरले. दोन वर्षांच्या खंडानंतर वडाच्या झाडाला धागा गुंडाळण्यासाठी महिलांनी एकच गर्दी केली. शहरात प्रामुख्याने समादेवी गल्ली, शहापूर, कचेरी गल्ली, नार्वेकर गल्ली, सोन्यामारुती चौक, चन्नम्मा सर्कल तसेच व्हॅक्सिन डेपो येथे वडांच्या झाडांभोवती महिलांची गर्दी दिसून आली.
सकाळी घरातील काम आटोपून महिलांनी वडाची पूजा केली. साधारण 12 च्या नंतर वटवृक्षाभोवती गर्दी झाली. नोकरदार महिलांनी घरामध्ये वटपूजेचा पट ठेवून आंबा, जांभळं, फणसाचे गरे, केळी आदी साहित्य ठेवून वडाच्या फांदीसह विधिवत पूजा केली.
यानिमित्त बाजारपेठेमध्ये या सर्व फळांची तसेच पूजा साहित्य म्हणजेच मणिमंगळसूत्र, आरसा-फणी, हिरव्या बांगडय़ा, हळदी-कुंकू आणि धागा यांचे द्रोण खरेदी करण्यास गर्दी झाली होती. दरम्यान, समाजमाध्यमांवर मात्र या व्रताबद्दल वेगवेगळय़ा प्रतिक्रिया उमटत होत्या. या व्रतामागचा वैज्ञानिक सिद्धांत समजून घेणे आवश्यक आहे, असाच सूर समाजमाध्यमांवर दिसला.
कपिलेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे विविध कार्यक्रम
श्रीक्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर देवस्थान ट्रस्टच्यावतीने वटपौर्णिमेनिमित्त मंदिरामध्ये विविध कार्यक्रम पार पडले. मुख्य म्हणजे यंदा या मंदिरात सावित्रीची मूर्ती बसविण्यात आली. महिलांनी तेथील वटवृक्षाच्या पूजेबरोबरच सावित्रीच्या मूर्तीचीही पूजा केली. महिलांनी वटपौर्णिमेनिमित्त उपवास केल्याने दुधाचे वाटप करण्यात आले.