पावसाचा भाजीपाला उत्पादनावर परिणाम ः मार्केटमध्ये जवारी बटाटा येण्यास सुरुवात
सुधीर गडकरी/ अगसगे
शनिवारच्या बाजारात आग्रा बटाटय़ाचे दोन ट्रक, इंदूर बटाटा चार ट्रक, कर्नाटक नवीन कांदा सुमारे सात ट्रक, महाराष्ट्र जुना कांदा 4 ट्रक आणि बेळगाव जवारी बटाटय़ाच्या सुमारे चार हजार पिशव्या तर रताळय़ाच्या चार हजार पिशव्या आवक झाल्याची माहिती अडत व्यापाऱयांनी दिली.
सध्या मार्केटयार्डमध्ये जवारी बटाटा येण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे काही खरेदीदार जवारी बटाटा खरेदीकडे वळले आहेत. यामुळे इंदूर-आग्रा बटाटा कमी प्रमाणात मागविण्यात येत आहे. तालुक्याच्या पश्चिम परिसर आणि खानापूर तालुक्यातील मसार आणि लाल जमिनीतील बटाटा विक्रीसाठी येत आहे. या बटाटय़ाला बेळगाव जिल्हय़ासह गोवा, पंजाब, पनवेल, दिल्ली, मुंबई आदी ठिकाणी पाठविण्यात येत आहे.
रताळय़ाची काढणी सुरू असल्याने बाजारात रताळय़ांची आवक महिन्यापासून होण्यास सुरुवात झाली. नवरात्रीत परराज्यांतून रताळय़ाला मोठय़ा प्रमाणात मागणी असते. सध्या बेळगावहून महाराष्ट्र, दिल्ली, मुंबई, गुजरात, पंजाब, हरियाणा, ललितपूर, पुणे आदी ठिकाणी रताळी पाठविण्यात येत आहे, अशी माहिती अडत व्यापारी अशोक बामणे यांनी दिली.
देशातील सर्व बाजारपेठांमध्ये कांद्याचा भाव स्थिर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कांदा दर टिकून आहे. यामुळे महिन्यापासून बेळगाव बाजारात कांदा भाव स्थिर आहे. तसेच कर्नाटकातील नवीन कांदा येण्यास सुरुवात झाली आहे. यंदा अद्याप बेळगावला परराज्यांतून कांदा खरेदीदारच आले नाहीत, अशी माहिती अडत व्यापाऱयांनी दिली.