नवीन भाजीपाला उत्पादनाकडे लक्ष
प्रतिनिधी/ बेळगाव
यंदाच्या वर्षभरात भाजीपाल्यांचे दर चढेच असलेले पाहायला मिळत आहेत. गेले काही दिवस भाजीपाल्यांच्या दरात वाढ झाली होती. आता नवीन भाजीपाला उत्पादन सुरु झाल्याने भाज्यांचे दर स्थिर होताना दिसत आहेत. स्थानिक भाजीपाला बाजारात आल्यानंतर काहीसे भाज्यांचे दर कमी होतील, अशी आशा आहे. लालभाजी, मेथी, शेपू आदी पालेभाज्यांचे दर चढेच आहेत. तर इतर भाज्यांचे दर स्थिर आहेत.
शनिवारच्या आठवडी बाजारात बटाटा 30 रुपये किलो, टोमॅटो 20 रुपये किलो, गाजर 50 रु. किलो, काकडी 60 रु. किलो, ढबू 50 रु. किलो, बिनिस 50 रु. किलो, ओली मिरची 100 रु. किलो, वांगी 40 रु. किलो, कोबी 20 रुपये एक, फ्लॉवर 20 रुपयाला एक, भेंडी 60 रुपये किलो, कारली 60 रु. किलो, दोडकी 60 रु. किलो, कोथिंबीर 10 रुपयाला एक पेंडी, लालभाजी 10 रुपयाला एक पेंडी, कांदापात 20 रुपयाला 4 पेंडय़ा, मेथी 20 रुपयाला एक, पालक 20 रुपयाला तीन पेंडय़ा, शेपू 10 रुपयाला एक, शेवग्याचा शेंगा 20 रुपयाला एक पेंडी असा भाजीपाल्यांचा दर आहे.
पालेभाज्यांचे दर इतर भाज्यांच्या तुलनेत अधिक आहेत. परतीच्या पावसाचा परिणाम भाजीपाला पिकावर झाला आहे. त्यामुळे भाज्यांचे दर वाढले आहेत. स्थानिक शिवारातील भाजीपाला उत्पादनाला सुरुवात झाल्यानंतर भाजीपाल्यांचे काहीसे कमी होतील. खरीप हंगामातील बटाटा, रताळी आणि भात कापणी सुरु झाली आहे. त्यानंतर भाजीपाला पिकाची लागवड झाली आहे. त्यामुळे नवीन उत्पादन सुरु झाल्यानंतर भाजीपाल्यांचे दर काहीसे कमी होतील.
आता हळूहळू भाजीपाल्यांची आवक वाढू लागली आहे. त्यामुळे भाज्यांचे दरही कमी होतील, असा अंदाज व्यक्त होत आहे. विशेषतः पालेभाज्यांचे दर वाढले आहेत.