भाजीपाल्यांबरोबर अंडी, बांगडय़ांना पसंती
प्रतिनिधी/ बेळगाव
परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने भाजीपाला पिकाला फटका बसला. त्यामुळे भाजीपाल्यांच्या दरात भरमसाट वाढ झाली आहे. मागील काही दिवसांपासून भाजीपाल्यांचे दर चढेच असल्याने सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसत आहे. आधीच महागाई वाढत चालली आहे. त्यातच भाजीपाल्यांच्या दराने सर्वसामान्य गृहिणींचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यामुळे वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. मेथी, शेपू, पालक, लालभाजीसह बिन्स, भेंडी, ओली मिरची, दोडकी आदी भाजीपाल्यांचे दर अद्याप चढेच आहेत.
शनिवारच्या आठवडी बाजारात कोबी 20 रुपयाला एक, फ्लॉवर 30 रुपयाला एक, बटाटा 40 रुपये किलो, कांदे 30 रुपये, ढबू 60 रु., गवार 80 रु., बिन्स 60 रु., ओली मिरची 100 रु., वांगी 40 रु., टोमॅटो 25 रु., भेंडी 60 रु., दोडकी 60 रु., गाजर 60 रु., काकडी 60 रु., कांदापात 20 रुपयाला तीन पेंडय़ा, मेथी 30 रुपयाला एक पेंडी, शेपू 10 रुपयाला एक पेंडी, पालक 10 रुपयाला एक, कोथिंबीर 10 रुपयाला एक असा भाजीपाल्यांचा दर आहे.
मेथीचा दरही चढाच
मागील कित्येक दिवसांपासून मेथीचा दर वाढलेला आहे. त्यामुळे पालेभाज्यांऐवजी काही नागरिक इतर भाज्यांनाच पसंती देत आहेत. सध्या काही भाज्यांच्या तुलनेत बांगडय़ाचे दर कमी आहेत. त्यामुळे काही नागरिक भाजीपाल्याऐवजी बांगडय़ांना पसंती देत आहेत. शिवाय थंडीला सुरुवात झाल्याने अंडय़ांची मागणी वाढली आहे. भाजांचे वाढते दर पाहता अंडय़ांना पसंती दिली जात आहे.
खाद्यतेलही चढय़ा दरानेच
दिवाळीच्या काळात खाद्यतेलांच्या किमतीत वाढ झाली आहे. पंधरा किलोच्या डब्यामागे 200 ते 400 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत नागरिकांना वाढत्या खाद्यतेलाचा चटका सहन करावा लागला. अद्यापही खाद्यतेलांचे दर कमी झाले नाहीत. त्यामुळे नागरिकांना चढय़ा दरानेच खाद्यतेल खरेदी करावे लागत आहे.