कोथिंबीर 40 रू पेंढी : सर्वसामान्यांना महागाईचा फटका
बेळगाव : किरकोळ बाजारात भाजीपाला दरात भरमसाट वाढ झाली आहे. त्यामुळे सर्व सामान्यांचा बजेट कोलमडले आहे. विशेषत: बाजारात पालेभाज्याची आवकच घटली आहे. कोथिंबीर 40 रु तर मेथी 20 रु पेंढी झाली आहे. त्यामुळे सर्व सामान्य भाजीपाला कसा खरेदी करावा असा प्रश्न पडू लागला आहे. यंदा जुलै आणि आता पडत असलेल्या पावसामुळे भाजीपाला पिकाला फटका बसला आहे. त्यामुळे भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने दरात मोठी वाढ झाली आहे. कांदा 60 रु किलो, टोमॅटो 20 रु किलो, वांगी 40 रु किलो, बिन्स 80 रु किलो, कारली 60 रु किलो, ढबू मिरची 60 रु किलो, गाजर 60 रु किलो, ओली मिरची 60 रु किलो, कांदापात 20 रुपये तीन पेंढ्या, भेंडी 7 रु. किलो असा दर आहे.
श्रावणमासामुळे भाजीपाल्याची मागणी वाढली आहे. दरम्यान आवक कमी असल्याने दरात वाढ झाली. शिवाय विविध प्रकाराच्या भाज्यांची आवक कमी दिसत आहे. त्यामुळे आहे तो भाजीपाला अधिक दराने खरेदी करावा लागत आहे. जुलै मध्यानंतर झालेल्या अतिवृष्टीचा भाजीपाला पिकाला फटका बसला आहे. लागवड केलेल्या भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नवीन उत्पादन कमी झाले आहे. हिरव्या पालेभाज्या बाजारात मिळणे मुश्कील झाले आहे. केवळ भेंडी, वांगी, कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, बिन्स आदी भाजीपाला पहावयास मिळत आहे. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे पुन्हा लागवड झालेल्या भाजीपाल्याला फटका बसणार आहे. त्यामुळे येत्या दिवसात भाजीपाल्याचे दर पुन्हा गगनाला भिडण्याची शक्यता आहे.