देश यंदा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत आहे. 75 वर्षांपूर्वी जेव्हा स्वातंत्र्याची पहाट उगवत होती, त्याचवेळी सीमाभागात हिंसाचाराचा हाहाकार उडालेला होता. पहिल्या स्वातंत्र्यदिनाचा आनंदोत्सव देशात साजरा होत असतानाच भारताची सीमा निर्वासितांच्या किंकाळय़ा आणि त्यांच्यावर झालेले अत्याचार यामुळे धगधगत होती. अशा परिस्थितीत तेरा वर्षांचा एक मुलगा आपल्या हातात सामानाचे गाठोडे घेऊन आपल्या आई-वडिल आणि कुटुंबाबरोबर पायी चालत पाकिस्तानातून भारताच्या सीमेत आला. त्याचे कुटुंब अक्षरशः नेसत्या वस्त्रांनिशी भारतात पोहोचले होते. कोणाच्याही खिशात एक पैसा नव्हता आणि येथे कोणी ओळखीचेही नव्हते. अशा स्थितीत या मुलाने रस्त्याकडेला बसून भाजीविक्री सुरू केली. हे करण्याखेरीज दुसरा कोणता पर्यायही नव्हता.
आज 88 वर्षांचे असणारे यशपाल सेठी यांच्या बालपणातील हा अनुभव आहे. भाजी विकता विकता त्यांनी अभ्यासही सुरू ठेवला. बेघर अवस्थेत अनेक वर्षे काढली. मात्र, विद्या व्यासंगावरील त्यांचे प्रेम कमी झाले नाही. तशा अत्यंत बिकट परिस्थितीत त्यांनी आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले आणि पुढे प्रशासकीय व्यवस्थेत जाण्यासाठी आयएएसच्या परीक्षा दिल्या. या परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत मानाचे पद प्राप्त केले. आता ते निवृत्त झाले आहेत. त्यांची मुलेही उच्चशिक्षित आहेत. मुलगी डॉक्टर असून मुलगा व्यावसायिक आहे. स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असताना त्यांनी आपली कहाणी उघड केली आहे. सध्या ते उत्तर प्रदेशातील कानपूर येथे स्थायिक आहेत. गुजरातमधील कसबा जलालपूरजट्टा हे त्यांचे मूळ गाव होते. तेथून त्यांचे कुटुंब व्यवसायानिमित्त पाकिस्तानात लाहोर येथे स्थायिक झाले होते. मात्र, भारताच्या आधी एक दिवस पाकिस्तान स्वतंत्र झाल्यानंतर त्यांना तेथे राहणे अशक्मय झाले. त्यामुळे सर्व काही गमावून भारतात परत यावे लागले. त्यांच्या जिद्दीची ही कहाणी अनेकांना प्रेरणादायी ठरलेली आहे.