वाराणसी जिल्हा न्यायालयात होणार सुनावणी
वाराणसी / वृत्तसंस्था
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वाराणसीचे जिल्हा न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेश सोमवारी ज्ञानवापी प्रकरणावर अत्यंत महत्त्वाचा निर्णय देणार आहेत. राखी सिंग आणि इतर चार महिलांनी दाखल केलेल्या याचिकांवर निवाडा अपेक्षित आहे. ज्ञानवापी संकुलात असलेल्या शृंगार गौरीच्या नियमित दर्शन-पूजेचे प्रकरण वाराणसी न्यायालयात सुरू आहे. यावर न्यायालयाच्या आदेशानंतर संपूर्ण संकुलाच्या सर्वेक्षणाचे काम करण्यात आले. मे आणि जून महिन्यात ही बाब देशभर चर्चेचा विषय ठरली होती.
वाराणसी न्यायालयाच्या निकालाविरुद्ध, ज्ञानवापी मशिदीची देखरेख करणाऱया अंजुमन इंट्राजेनिया कमिटीने सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण कायम ठेवण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा न्यायाधीशांना सुनावणी पूर्ण करून निकाल देण्यास सांगितले होते. आता सोमवारी याच प्रकरणावर जिल्हा न्यायाधीश निर्णय देणार आहेत. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने एक अत्यंत महत्त्वाचे निरीक्षण नोंदवल्यानंतर आता निर्णय आपल्या बाजूने येईल, अशी अपेक्षा हिंदू पक्षातील लोकांना आहे.