Veteran actor Bhalchandra Kulkarni passed away ज्येष्ठ चित्रपट आणि नाट्य अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे अल्पशा आजाराने आज सकाळी सहाच्या सुमारास निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. सकाळी साडेअकरा वाजता कोल्हापुरातील कळंबा शिवप्रभूनगर येथील निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. दुपारी 12 वाजता त्यांच्यावर पंचगंगा स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
पिंजरा, मुंबईचा जावई, सोंगाडय़ा, थरथराट, खतरनाक, माहेरची साडी, शुभ बोल नाऱ्या, शिवरायांची सून, झुंज तुझी माझी अशा ३०० हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारत भालचंद्र कुलकर्णी यांनी चार ते पाच दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. मात्र, मागील काही वर्षांपासून ते अभिनय क्षेत्रापासून दूर होते. काही महिन्यांपूर्वी त्यांना ब्रँड कोल्हापूर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यावेळी ते प्रेक्षकांच्या समोर आले होते.
भालचंद्र कुलकर्णी हे अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे संचालक होते. चित्रपट महामंडळाने त्यांना चित्रभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. चित्रपट महामंडळाच्या सांस्कृतिक, चित्रपट विषयक तसेच आंदोलनात्मक कामातही ते सक्रिय होते. शालिनी, जयप्रभा स्टुडिओचे जतन व्हावे, या लढय़ात ते अग्रभागी होते. अतिशय साधी राहणी असलेल्या कुलकर्णी यांनी काही काळ प्रायव्हेट हायस्कूलमध्ये शिक्षक आणि मुख्याध्यापक म्हणून ही काम केले होते.