मुंबई : मराठी सिनेसृष्टीतून अनेक मराठी चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केलेले ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे शनिवारी पहाटे मुंबईत निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. कदम त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. विजय कदम गेल्या अनेक वर्षांपासून कॅन्सरशी झुंज देत होते आणि त्यांनी त्यावर मात केली होती, मात्र त्यांचा कॅन्सर पुन्हा बळावला, त्यामुळे त्यांना पुन्हा मुंबईतील अंधेरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. विजय कदम 1980 आणि 90 च्या दशकात प्रचंड लोकप्रिय होते. विजय कदम त्यांच्या अष्टपैलू अभिनय क्षमतेसाठी ओळखले जात असे, त्यांनी गंभीर भूमिकांप्रमाणेच विनोदी भूमिकाही केल्या. त्या मोठ्या प्रमाणावर गाजल्या. विजय कदम यांच्या निधनाच्या बातमीनंतर संपूर्ण कलासृष्टीतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मराठी सिनेसृष्टीने एक मोठी हरहुन्नरी कलाकार गमावला असल्याची भावना सिनेसृष्टीच्या कलाकारांनी व्यक्त केली आहे.
कदम यांचे चित्रपट आणि नाटके
विजय कदम यांनी रंगभूमी सोबतच मराठी चित्रपटात देखील काम केलं होतं. ‘विच्छा माझी पुरी करट हे त्यांचं लोकनाट्या आणि ‘खुमखुमी’ हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर गाजले होते. या कार्यक्रमापासून त्यांची लोकप्रियता वाढत गेली. ‘रथचक्र‘, ‘टुरटूर‘ यांसारख्या नाटकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. 1980च्या दशकात छोट्या-मोठ्या विनोदी भूमिका साकारून त्यांनी आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली होती.