वृत्तसंस्था/ जोहोर (मलेशिया)
शनिवारपासून येथे सुरू झालेल्या सुल्तान जोहोर चषक पुरुषांच्या कनिष्ठ हॉकी स्पर्धेत भारतीय संघाने आपल्या मोहिमेला विजयाने प्रारंभ करताना यजमान मलेशियाचा 5-2 अशा गोलफरकाने पराभव केला.
या सामन्यात यजमान मलेशियाच्या तुलनेत भारताचा खेळ अधिक दर्जेदार आणि वेगवान झाला. भारतीय संघातर्फे अमनदीप, अरजित सिंग हुंडाल, बॉबी सिंग धामी, सुदीप चिर्मेको आणि शारदानंद तिवारी यांनी गोल केले. मलेशियातर्फे शमी इरफान सुहामी आणि मोहमद मेमत यांनी गोल नोंदविले. भारतीय संघाचा कर्णधार उत्तम सिंगने सुरुवातीपासून चढाया करत मलेशियाच्या बचावफळीवर चांगलेच दडपण आणले. पण मलेशियाची बचावफळी भक्कम असल्याने भारताला हा सामना अधिक गोलफरकाने जिंकता आला नाही. सहाव्या मिनिटाला अमनदीपने मैदानी गोलवर भारताचे खाते उघडले. त्यानंतर हुंडालने दहाव्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर भारताचा दुसरा गोल केला. तेराव्या मिनिटाला मलेशियाचे खाते शमी इरफान सुहामीने उघडले. सामन्यातील पहिल्या 15 मिनिटांच्या कालावधीत भारताने मलेशियावर 2-1 अशी आघाडी घेतली होती. सामन्याच्या दुसऱया 15 मिनिटांच्या कालावधीत भारताने दोन गोल केले. बॉबीसिंग धामीने 20 व्या मिनिटाला भारताचा तिसरा गोल केला. 26 व्या मिनिटाला सुदीप चिर्मेकोने चौथा गोल नोंदविला. मध्यंतरापर्यंत भारताने मलेशियावर 4-1 अशी आघाडी मिळविली होती. उत्तरार्धात मलेशियाच्या मोहमद मेमातने गोल नोंदवून भारताची आघाडी थोडी कमी केली पण 56 व्या मिनिटाला शारदानंद तिवारीने पेनल्टी कॉर्नरवर आपल्या संघाचा पाचवा गोल नेंदवून मलेशियाचे आव्हान संपुष्टात आणले. या स्पर्धेतील भारताचा पुढील सामना दक्षिण आफ्रिकेबरोबर होत आहे.