राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांची टीका : नागरिकांनी मत देताना धर्म बाजूला ठेवावा : खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, खासदार नवनीत राणा बोगस प्रमाणपत्रांवर निवडून आले
प्रतिनिधी/सोलापूर
मनसेप्रमुख राज ठाकरे हे काही बोलले तरी त्यांना कधीही शरद पवार होता येणार नाही, शरद पवार समजून घेण्यासाठी अगोदर त्यांची 4-5 पुस्तके वाचा , अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी केली.
महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण या रविवारी सोलापूर दौऱयामध्ये सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांवर टीका करून अनेक नेते मोठे झाले आहेत. कुठे गेली त्यांची ब्लू पिंट. त्याच्या माध्यमातून ते महाराष्ट्राचा विकास करणार होते. निश्चित त्यांच्या मनात राज्याविषयी तळमळ आहे ते चांगले वक्ते आहेत. त्यांचे व्हिजन आहे मात्र ते सध्या भरकटल्या सारखे करत असल्याचे यावेळी चव्हाण म्हणाल्या.
ज्या पद्धतीने भाजपने दोन समाजात भांडण लावून दोन खासदारांवरून जास्त संख्येने खासदार निवडून आले. आता राज ठाकरेंनी असेच वाटू लागले आहे. भगवावस्त्र परिधान करून भूमिका बदलत आहे. असे केलेतरी मत मिळणार नाही. लोक आता जागृत झाले आहेत. पत्रकार परिषदेत उजनी धरणातील पाण्याचा विषय, मंत्री नवाब मलिक प्रकरण यावर त्यांनी मत व्यक्त केले.
या पत्रकार परिषदेस पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष कविता म्हेत्रे, प्रदेश उपाध्यक्ष विद्या लोलगे, प्रदेश सचिव नलिनी चंदेले, शहराध्यक्ष सुनिता रोटे, लता ढेरे, मनीषा नलावडे, लता फुटाणे आदी महिला पदाधिकारी तसेच कार्यकर्त्या यावेळी उपस्थित होते.
मनमोहन सिंग यांच्या काळात 400 रुपये गॅस
मनमोहन सिंग यांच्या काळात गॅस चारशे रुपये पर्यंत होता. मात्र आता मोदी सरकारच्या काळात गॅस हजार रुपयांवर गेले आहे. सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. आता लोकांनी भाजपची जागा दाखवली पाहिजे, असेही चव्हाण म्हणाल्या.
तुम्ही चुकीच्या खासदारांना निवडून दिलं
सोलापूरमधील ज्या मूलभूत गरजा आहेत, त्या सोडवण्यासाठी सोलापुरातील खासदारांनी प्रयत्न केले नाही. नागरिकांनी चुकीच्या खासदारांना निवडून दिले आहे. त्यांनी बोगस सर्टिफिकेट दिलं, निवडणूक रद्द करायला होती. मात्र मात्र तसे काहीच झाले नाही. हनुमान चालीसा म्हणणाऱया खासदार नवणीत राणा यांचेही बोगस प्रमाणपत्र आहे. चुकीच्या खासदाराला निवडून दिले तर हे असच होणार. नागरिकांनी धर्म बाजूला ठेवत योग्य व्यक्तीस निवडून दिले पाहिजे असेही चव्हाण म्हणाल्या.