वृत्तसंस्था/ हो चि मिन्ह सिटी
येथे झालेल्या हंग तिन्ह पेंडली फुटबॉल स्पर्धेतील दुसऱया सामन्यात भारतीय संघाला यजमान व्हिएतनामकडून 0-3 अशा गोलफरकाने पराभव स्वीकारावा लागला.
भारतीय संघासाठी हा भानावर आणणारा सामना होता. 104 क्रमांकावर असणाऱया भारताने गेल्या जूनमध्ये आशियाई चषक पात्रता फेरीत तीन विजय मिळविले आणि येथील स्पर्धेत गेल्या शनिवारी सिंगापूरविरुद्ध 1-1 अशी बरोबरी साधली. त्यामुळे भारतीय संघ काहीसा गाफील झाला होता. पण व्हिएतनामकडून झालेल्या पराभवाने ते जमिनीवर आले आहेत. या सामन्यात सर्वच बाबतीत त्यांना 97 व्या मानांकित व्हिएतनामने आऊटप्ले केले. फान व्हान डुक (10 वे मिनिट), एन्ग्युएन व्हान तोआन (49 वे मिनिट) व एन्ग्युएन व्हान क्युएट (70 वे मिनिट) यांनी यजमान संघाचे गोल केले. उत्तरार्धात बचावफळीचे खराब प्रदर्शन झालेल्या भारताला एकही गोल नोंदवण्यात यश आले नाही. 26 व्या मिनिटाला आकाश मिश्राने प्रतिआक्रमणात बॉक्समधून आशिक कुरुनियनकडे चेंडू पुरवला. कुरुनियने मारलेली व्हॉली गोलरक्षकाला चकवा देत पुढे गेली, पण गोलपोस्टच्या किंचीत बाजूने बाहेर गेली. नंतर पुन्हा एकदा आकाश मिश्राने पुरविलेल्या चेंडूला सुनील चेत्रीने हेडरने गोलजाळय़ाची दिशा दिली. पण तो चेंडू गोलपोस्टपासून किंचित दूरवरून गेला. सामन्याच्या पूर्वार्धात मात्र भारताने व्हिएतनामशी तोडीस तोड खेळ केला, पण उत्तरार्धात भारताला हा जोम टिकविता आला नाही. व्हिएतनामने दोन सामने जिंकून ही स्पर्धाही जिंकली आहे. याआधी त्यांनी पहिल्या सामन्यात सिंगापूरचा 4-0 असा फडशा पाडला होता.
भारत व व्हिएतनाम यांच्यात यापूर्वी अनेक संस्मरणीय झाले आहेत. 2002 एलजी कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत झालेली लढत विशेष लक्षात राहणारी होती. भारतीय संघ पिछाडीवर पडल्यानंतरही 3-1 अशा गोलफरकाने सामना जिंकत त्यावेळी जेतेपद पटकावले होते. 2010 मध्ये या दोन संघांत शेवटचा सामना मैत्रिपूर्ण सामना पुणेमध्ये झाला होता. त्यात भारताने 3-1 असा विजय मिळविला होता आणि सुनील चेत्रीने हॅट्ट्रिक नोंदवली होती. पण त्यानंतर व्हिएतनाम संघाने बऱयापैकी प्रगती केली असून खंडातील अव्वल संघांविरुद्ध त्यांनी चांगले प्रदर्शन केले आहे. यावर्षीच्या सुरुवातीस झालेल्या फिफा विश्वचषक पात्रता स्पर्धेत त्यांनी शेवटच्या फेरीत स्थान मिळविले तर 2019 आशियाई चषक स्पर्धेत शेवटच्या आठ संघांत स्थान मिळविले होते.