ऑनलाईन टीम / तरुण भारत :
सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कर्जबुडवा उद्योगपती विजय माल्याला 4 महिन्यांचा तुरुंगवास आणि 2 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. (Vijay Mallya sentenced to 4 months in jail And a fine of Rs 2,000 for contempt of Supreme Court) न्यायमूर्ती यू. यू. ललित यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने ही सुनावणी केली.
न्यायालयाच्या परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार विजय माल्ल्याला करता येणार नाही, असे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र, तरीही माल्ल्याने डिएगो डीलचे 40 मिलियन डॉलर त्याच्या मुलांच्या परदेशातील खात्यांमध्ये हस्तांतरित केले होते. त्यानंतर डिएगो डीलचे पैसे न्यायालयात जमा करण्यात यावेत, अशी मागणी बँकांनी केली होती. मालमत्तेविषयी योग्य ती माहिती माल्ल्याने लपवली होती. त्यामुळे 9 मे 2017 रोजी माल्ल्याला दोषी ठरविण्यात आले होते. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका माल्ल्यावर ठेवण्यात आला.
हेही वाचा : गोव्यातही ईडीचा धाक दाखवून फोडाफोडी
सर्वोच्च न्यायालयाने 10 मार्च रोजी झालेल्या सुनावणीवेळी यासंदर्भातील निकाल राखून ठेवला होता. आज त्यावर सुनावणी झाली. न्यायालयाच्या अवमानप्रकरणी माल्ल्याला 4 महिन्यांचा तुरुंगवास आणि 2 हजारांचा दंड ठोठावण्यात आला. माल्ल्या सध्या लंडनमध्ये आहे. तिथे त्याने काही कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. लंडन सरकारने या प्रक्रियेत भारत सरकारला पक्ष बनवलेले नाही किंवा त्याची माहिती भारत सरकारसोबत शेअर केली नाही. त्यामुळे माल्ल्याला अद्याप भारतात आणण्यात यश आले नाही.