विद्यार्थी, शेतकरी, नोकरदारांनी करायचे काय?पुरातन पाखाडी तोडल्याने तोही मार्ग बंदच, ऐन पर्यटन हंगामात परशुराम मंदिर परिसरालाही फटका
प्रतिनिधी/चिपळूण
मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात चौपदरीकरणासाठी माथ्यावरील डोंगर कटाईसह मातीच्या भरावाच्या कामासाठी घाटातील वाहतूक पुन्हा बंद करण्याचा विचार सुरू झाला आहे. मात्र यावर्षीच्या उन्हाळ्यात आणि त्यानंतरच्या पावसाळ्यात घाट बंद करण्यात आल्याने मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागले असल्याने यावेळी मात्र घाट बंद करण्यास परशुराम ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. तसे झाले तर विद्यार्थी, नोकरदार आणि शेतकऱयांनी करायचे काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
परशुराम घाटात गेले वर्षभर काम सुरु आहे. घाटात डोंगर कापताना यापूर्वी अपघात घडल्याने महिनाभर घाटातील वाहतूक बंद ठेवून कामे करण्यात आली. त्यानंतर पावसाळ्यात पोखरलेला डोंगर खचल्याने अतिवृष्टीत घाट पुन्हा बंद ठेवावा लागला. परिणामी अवजड वाहतूक बंद ठेवून ती कळंबस्ते, आंबडस, चिरणी मार्गे लोटेकडे वळवण्यात आली. मात्र यामध्ये सर्वात मोठा फटका हा माथ्यावर वसलेल्या परशुराम ग्रामस्थांना बसला होता. शेती घाटाच्या खाली असल्याने आणि दैनंदिन व्यवहारही चिपळूण बाजारपेठेशी असल्याने साहजिकच घाट बंद कालावधीत त्यांना घरातच अडकून पडावे लागले होते. शिवाय शाळांनाही सुट्टी दिली गेल्याने विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक नुकसानीला सामोरे जावे लागले होते.