तानाजी सावंतांची लायकी काय?, विनायक राऊतांचा घणाघात
आदित्य ठाकरे यांच्यावर तानाजी सावंतांनी हल्लाबोल केल्यावर आता शिवसेनेतून देखील याचे प्रत्यूत्तर देण्यात आले आहे. शिंदे गटातील आमदार गद्दारांची कीड आहे, भाजप त्यांना पोसतंय. त्यांना स्वत:चा आवाज राहिला नाही. भाजपाला शिवसेना संपवायची आहे. तानाजी सावंतांची लायकी काय? असा घणाघात शिवसेना नेते विनायक राऊत यांनी केला. आयत्या बिळात नागोबा होणारा तानाजी सावंत आहे. शिवसेनेच्या भानगडीत पडू नका, सेनेची ताकद काय आहे ते तुम्हाला दिसून आली आहे असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. आज ते कोल्हापूरात बोलत होते.
शिवसंवाद यात्रेसंदर्भात बोलताना ते म्हणाले, अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हजारो शिवसैनिकांनी साथ दिली आहे. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, शिवसेना, आदित्य ठाकरे यांच्यावर असलेले प्रेम दिसून येत आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवसेना सत्तेवर येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भाजपावर निशाणा साधताना ते म्हणाले, भाजपाने शिवसेनेला कुंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. काल जे.पी.नड्डा यांच्या तोंडून सत्य बाहेर पडले आहे. दु:ख याचे आहे की एकनाथ शिंदे यांना साथ देत आहेत. शिवसेनेला संपवण्याचा भाजप प्रयत्न करत आहे. याच्या पापाचे वाटेकरी हे बंडखोर आमदार ठरणार आहेत. मात्र सेनेला संपवणारा अजून जन्माला आला नाही अशा शब्दात राऊतांनी टीका केली.ऑपरेशन लोटस करताना त्यांचा मुंबईवर डोळा आहे. मुंबई गुजरातला जोडायची आणि केंद्रशासीत प्रदेश करायचा असा कुटील डाव भाजप खेळत आहे.
संजय राऊतांच्या अटके विषयी बोलताना ते म्हणाले, संजय राऊत शिवसेनेची ढाल म्हणून काम करत आहेत. खासकरून भाजप विरोधात ते लढत आहेत त्याचा सूड म्हणून त्यांना अटक करण्यात आली आहे.