ठाकरेंच्या सेनेकडील नाराज मतांवर लक्ष;
प्रतिनिधी/ कराड
महाराष्ट्रात लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा जिंकण्याची रणनीती भारतीय जनता पक्षाने आखली असून या अंतर्गत लोकसभा प्रवास योजनेंतर्गत पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी येथे भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाची रणनीती विषद केली. यावेळी प्रदेश सचिव विक्रम पावसकर, सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले, युवा नेते धैर्यशिल कदम, मनोज घोरपडे, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, ऍड. भरत पाटील आदी उपस्थित होते.
विनोद तावडे म्हणाले की, देशभरात असे काही लोकसभा मतदारसंघ आम्ही काढले आहेत. जिथे थोडी ताकद लावली तर पक्षाला यश मिळू शकते. त्यामुळे लोकसभा प्रवास योजनेंतर्गत केंद्राचे 40 मंत्री देशभरात फिरत आहेत. दिल्लीचा मंत्री गल्लीत या अंतर्गत केंद्र सरकारने ज्या योजना जनतेसाठी लागू केल्या, त्याचा आढावा घेत आहेत. त्या गावपातळीपर्यंत यशस्वीपर्यंत पोहोचल्यात का, याचा आढावा घेतला जात आहे. महाराष्ट्रात 48 पैकी 18 मतदारसंघात हे नियोजन या योजनेचे प्रमुख बाळासाहेब हेगडे हे पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवत आहेत.
महाराष्ट्रात 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीत सर्व पक्ष वेगळे लढले होते. त्यावेळी भाजपला 29, शिवसेनेला 19, काँग्रेसला 18 तर राष्टवादीला 17 टक्के मते मिळाली होती. शिवसेनेच्या मतांपैकी 10 टक्के हिंदुत्वाची आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीबरोबर गेल्याने शिवसेनेची ही 8 ते 10 टक्के मते खिळखिळी झालेली आहेत. ती भाजपकडे वळवण्याचे टार्गेट कार्यकर्त्यांसमोर आहे. पंतप्रधानांनी जनतेसाठी विविध योजना राबवल्यात, त्यामुळे दोन्ही काँग्रेसकडे असणारी ही 10 टक्के मते भाजपकडे वळवण्याचे कार्यकर्त्यांसमोर आहे. विरोधक एकत्र राहतील, ही वस्तुस्थिती असली तरी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडे राजकीय समजुतदारपणा दिसत नाही. विदेशात जाऊन भारताबद्दल वक्तव्ये करण्यात आली आहेत. राहुल गांधींकडे राजकीय समंजसपणा नसल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली विरोधक निवडणुकीला कसे सामोरे जाणार? हाही प्रश्न आहे, मोदी सरकारने गेल्या 9 वर्षात केलेले काम व पुढे करायचे काम हे घेऊन भाजप निवडणुकीची तयारी करत आहे, असे तावडे म्हणाले.
एकत्र निवडणुकांची शक्यता नाही
पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना म्हणाले की, भाजप सर्व मतदारसंघात तयारी करत असून एनडीए मजबूत करण्यासाठी करत आहे. याचा फायदा जो उमेदवार असेल, त्याला होईल. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राजकारणात हिंदुत्व आणले. 2019 नंतर शिवसेनेने ते संपवून टाकले. दोन्ही काँग्रेसबरोबर गेल्याने उद्धव ठाकरेंची शिवसेना कमकुवत झाली आहे. राज ठाकरे यांच्या मनसेबरोबर युतीची शक्यता आज तरी वाटत नाही. पक्षात आपण नाराज नसून तसे कोणतेही वक्तव्य केलेले नाही. पक्षाच्या आदेशाप्रमाणे काम करत आहे. राज्यात लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका एकत्र होण्याची कोणतीही शक्यता नाही, असे ते म्हणाले.