लष्कराला पाचारण : संचारबंदी लागू : रिकामी घरे पेटवल्याने संताप
► वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरमध्ये 18 दिवसांनंतर पुन्हा हिंसाचार उसळला. राजधानी इंफाळच्या न्यू लॅम्बुलेन भागात सोमवारी काही रिकामी घरांना हल्लेखोरांनी आग लावली. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सरकारने या भागात लष्कर तैनात केले आहे. याशिवाय प्रशासनाने या भागात संचारबंदी लागू केली असून 26 मे पर्यंत इंटरनेटवर बंदी घालण्यात आली आहे. नव्याने घडलेल्या जाळपोळ आणि हिंसाचार प्रकरणी सुरक्षा यंत्रणांनी तिघांना अटक केली आहे. त्यांची कसून चौकशी सुरू असून अन्य संशयितांचा शोध घेण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे.
मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये स्थानिक बाजारपेठेतील एका जागेवरून वाद सुरू झाल्यानंतर हे प्रकरण हळूहळू वाढत गेले. हल्लेखोरांनी काही घरांना आग लावली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी निमलष्करी दल आणि लष्कराला पाचारण करण्यात आले. हिंसाचारामुळे आतापर्यंत 10,000 हून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. सरकारने दंगलखोरांना गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत.
17 मे रोजी सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. हिंसाचारग्रस्त लोकांना देण्यात येत असलेल्या मदत, संरक्षण आणि पुनर्वसनाचा ताजा स्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने राज्य सरकारला दिले. मणिपूर ट्रायबल फोरम आणि हिल एरिया कमिटीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर जुलैमध्ये न्यायालय पुन्हा एकदा या प्रकरणावर सुनावणी करणार आहे.
3 मेपासून हिंसाचार सुरू
मणिपूरमध्ये 3 मे रोजी चुराचंदपूर जिह्यातील तोरबांग भागात हिंसाचार उसळला होता. या दिवशी अखिल आदिवासी विद्यार्थी संघटनेने आदिवासी एकता मोर्चा काढला होता. 4 मे रोजी चर्चंदपूरमध्ये मुख्यमंत्री एन. वीरेन सिंह यांच्या कार्यक्रमापूर्वी आंदोलकांनी त्यांच्या व्यासपीठाची तोडफोड आणि जाळपोळ केली. यानंतर राज्यातील 10 हून अधिक जिल्ह्यांमध्ये हिंसाचार पेटला होता. हिंसक घटनांमध्ये आतापर्यंत 71 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 230 हून अधिक लोक जखमी झाले असून 1,700 घरे जळाली आहेत.