शेळ मेळावलेतील नागरिकांचा इशारा : ‘भूखंड’ प्रक्रियेबाबतच्या वृत्ताने खळबळ
प्रतिनिधी /वाळपई
शेळ मेळावली येथील जनतेने आयटी प्रकल्पाला विरोध केलेल्या जागे बेकायदा भूखंड पाडण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर परिसरात खळबळ माजली. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी बैठक घेऊन जागेत कुणी भूखंड पाडण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र विरोध करून हाणून पाडला जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. दरम्यान, बेकायदा भूखंड पाडण्याचा प्रकार अद्याप घडलेला नाही, असे स्पष्ट करण्यात आले. सत्तरी तालुक्मयातील गुळेली पंचायत क्षेत्रातील शेळ मेळावली या ठिकाणी सरकारने आयआयटी प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या प्रकल्पाच्या विरोधात मोठे आंदोलन केल्यानतंर येथील प्रकल्पाचा प्रस्ताव मागे पडला.
दरम्यान, आयआयटी प्रकल्प रद्द झाल्यानंतर या ठिकाणी काही अज्ञात इस्मानी सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून भूखंड पाडण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर याबाबत स्थानिकांनी बैठक घेऊन चर्चा केली. शेळ मेळावली येथे बेकायदा भूखंड तयार प्रयत्न झाल्यास हाणून पाडण्यात येईल. या भागातील निसर्गाचे व पर्यावरणाचे रक्षण करण्याची जबाबदारी या भागातील भूमिपुत्रांची आहे. यामुळे या निसर्गावर व पर्यावरणावर वक्रदृष्टी करण्याचा प्रयत्न केल्यास कोणत्याही स्थितीत सहन केले जाणार नाही. त्या विरोधात पेटून उठण्याचा इशारा नागरिकांनी दिला.