वृत्तसंस्था / केदारनाथ
उत्तराखंडच्या केदारनाथ धाममध्ये भाविकांची मोठी गर्दी होऊ लागल्याने प्रशासनाने शुकवारी व्हीआयपी एंट्रीवर बंदी घातली आहे. आता सर्व व्हीआयपी व्यक्ती देखील सर्वसामान्य लोकांप्रमाणेच दर्शन घेणार आहेत. दर्शनासाठी केवळ 2 तासांचा वेळ दिला जाणार असल्याची माहिती पोलीस महासंचालकांनी शुक्रवारी दिली आहे. यापूर्वी योग्य व्यवस्था नसल्याने यात्रेदरम्यान 28 भाविकांचा मृत्यू ओढवला आहे.
आरोग्यासंबंधी समस्या असणाऱया लोकांनी काही दिवसांनी यात्रेत सहभाग घ्यावा असे आवाहन उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी केले आहे. कोरोना महामारीमुळे स्थगित राहिलेली चारधाम यात्रा सुमारे 2 वर्षांनी सुरू झाली आहे. दर्शन घेण्यासाठी भाविक मोठय़ा संख्येत पोहोचत आहेत. मागील 6 दिवसांमध्ये सुमारे 1 लाख 30 हजार लोकांनी दर्शन घेतले आहे. याचमुळे प्रशासनाने व्हीआयपी एंट्रीवर बंदी घातली आहे.
यापूर्वी प्रशासनाकडून योग्य व्यवस्था न करण्यात आल्याने अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. रुद्रप्रयागमधून 11 आजारी व्यक्तींना एअरलिफ्ट करत अन्य ठिकाणी हलविण्यात आले आहे. भाविकांची मोठी गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी आणि लाठीमार करण्याची स्थिती निर्माण झाली होती. केदारनाथसह बद्रीनाथ आणि यमुनोत्रीमध्येही प्रशासनाचा निष्काळजीपणा दिसून आला होता.
चारधाम यात्रेवर येणाऱया सर्व भाविकांना आता एकाच रांगेत उभे राहून दर्शनासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. रांगेत उभे असलेल्या भाविकांना दोन तासांत दर्शन करविण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱयांनी दिली आहे.
दररोज वाढत चाललेली गर्दी पाहता मंदिरात आयटीबीपी आणि एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहेत. याचबरोबर मार्गात पोलीस लोकांना मदत करत आहेत. काही दिवसांपूर्वी निष्काळजीपणाच्या घटना समोर आल्याने सरकारने आता कठोर पावले उचलली आहेत.