केंद्र सरकारने घेतला निर्णय ः सर्वसामान्य भाविकांप्रमाणे व्हावे लागणार सामील
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
हज यात्रेसाठीच्या व्हीआयपी संस्कृतीवरून केंद्र सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकार आता हज यात्रेत व्हीआयपी संस्कृती पूर्णपणे समाप्त केली आहे. हज यात्रेसाठी व्हीआयपी कोटय़ातील राखीव जागा संपुष्टात आणल्या गेल्या आहेत. पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, अल्पसंख्याक मंत्र्यांसह हज समितीसाठी राखीव व्हीआयपी कोटय़ातील सर्व जागा संपुष्टात आल्या आहेत. यामुळे आता महनीयांना देखील सर्वसामान्य भाविकांप्रमाणेच हजमध्ये सामील व्हावे लागणार आहे, कुणासाठीच कुठलीच विशेष व्यवस्था किंवा राखीव स्थान नसणार आहे.
सौदी अरेबियाने यावेळी हज यात्रेदरम्यान लागू कोरोना निर्बंध पूर्णपणे मागे घेतले आहेत. यामुळे यंदा कुठल्याही निर्बंधासाठी हज यात्रा करता येणार आहे. तसेच या निर्णयामुळे हज यात्रेकरूंच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. सौदी अरेबियाने भारताच्या भाविकांचा कोटा 1.75 लाखावरून वाढवत आता 2 लाख केला आहे. सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या एका बैठकीनंतर या निर्णयाची घोषणा केली होती. या निर्णयानंतर भारतातील सर्व राज्यांमधून अर्ज करणाऱया बहुतांश जणांना यात्रा करण्याची संधी मिळणार आहे. पूर्वी हजारो लोकांचा अर्ज प्रलंबित राहिला होता, त्यांना आता मंजुरी दिली जात आहे. उत्तर प्रदेशातून सर्वाधिक भाविक हज यात्रेसाठी अर्ज करतात. या राज्यातून सुमारे 30 हजारांहून अधिक जण यात्रेवर जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.