मराठी बांधवांनी मेठय़ा संख्येने सहभागी होण्याचे म. ए. समितीचे आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संपूर्ण सीमाभाग अन्यायाने 66 वर्षांपूर्वी कर्नाटकात डांबण्यात आला. अनेक वर्षे उलटली तरी मराठी भाषिकांचा भाषावर प्रांतरचनेला अद्यापही विरोध आहे. त्यामुळेच न्यायालयीन लढायासोबतच रस्त्यावरचीही लढाई सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून मंगळवार दिनांक 1 नोव्हेंबर रोजी विराट सायकल फेरी काढून पुन्हा एकदा मराठी अस्मिता दाखवून देण्यात येणार आहे.
केंद्र सरकारने 1956 साली भाषिक आधारावर प्रांतरचना करताना बेळगावसह 865 मराठी गावे अन्यायाने तत्कालिन म्हैसूर राज्यात समाविष्ट करण्यात आली. हा दिवस काळादिन म्हणून गांभीर्याने पाळण्यात येतो. बेळगाव शहरात केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी सायकल फेरीचे आयोजन केले जाते. सीमाभागावर झालेला अन्याय आजही न विसरण्यासारखा आहे. भाषावार प्रांतरचनेनंतर बेळगावसह सीमाभागावर झालेल्या अन्यायामुळे येथील मराठी भाषिक वर्षानुवर्षे अत्याचार सहन करत आहेत. तसेच भाषिक अधिकारांसाठी झगडत आहेत. कर्नाटक सरकारकडून दिवसेंदिवस कन्नड सक्तीचा वरवंटा अधिक तीव्र केला जात असल्याने मराठी भाषिकांसाठी ही आरपारची लढाई आहे. त्यामुळे संघटित राहून मराठी भाषा आणि संस्कृती जपण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मागील दोन वर्षात कोरोनामुळे सायकल फेरी काढण्यात आली नव्हती. परंतु यावषी कोरोनाचे निर्बंध हटल्यामुळे भव्य सायकल फेरी काढून मराठी भाषिक आपला विरोध दर्शवणार आहेत.
महाद्वार रोड येथील संभाजी उद्यानापासून मंगळवार दि. 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता सायकल फेरीला प्रारंभ होणार असून तेथून शहापूर, गोवावेस या परिसरातून मूक सायकल फेरी निघणार आहे. रेल्वे ओव्हर ब्रिज येथील मराठा मंदिर येथे फेरीची सांगता होईल. त्यानंतर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेते मंडळी उपस्थित राहणार आहे. काळय़ा दिनानिमित्त निमित्त काढण्यात येणाऱया मूक सायकल फेरी व जाहीर सभेसाठी मोठय़ा संख्येने मराठी भाषिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे करण्यात आले आहे.
सदर सायकल फेरीत कोणत्याही प्रकारच्या घोषणा न देता कार्यकर्त्यांनी शिस्तबद्धरित्या सहभागी होऊन मोर्चा यशस्वी करावा, असे आवाहन ता. म. ए. समितीने केले आहे. मूक सायकल फेरीची सांगता मराठा मंदिर येथे सभेने होणार आहे.