मुंबई / वृत्तसंस्था
आधुनिक क्रिकेटमधील अव्वल दर्जाचा फलंदाज विराट कोहली सातत्याने खराब फॉर्ममधून जात असून यावर मार्ग काढण्यासाठी त्याने क्रिकेटमधून काही काळ ब्रेक घेणे आवश्यक असल्याचे मत भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मांडले. विराटकडे फक्त 6-7 वर्षे क्रिकेट बाकी आहे. त्यामुळे, पूर्वीसारखे सातत्य राखायचे असेल तर त्याने ब्रेक घेण्याची गरज आहे, असे ते यावेळी म्हणाले. लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध आयपीएल साखळी सामन्यात विराटवर गोल्डन डकची नामुष्की आली. त्यानंतर शास्त्री प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
काही महिन्यांपूर्वी भारतीय संघाच्या नेतृत्वावरुन पायउतार झाल्यानंतर विराट कोहली अतिशय खराब फॉर्ममध्ये असून त्याला नोव्हेंबर 2019 पासून कोणत्याही क्रिकेट प्रकारात शतक झळकावता आलेले नाही. अगदी आयपीएल स्पर्धेतही त्याचा खराब फॉर्म ‘जैसे थे’ राहिला असून त्याला 7 सामन्यात 19.83 च्या सरासरीने केवळ 119 धावा जमवता आल्या आहेत. भारतीय संघ जुलैमध्ये इंग्लंड दौऱयावर जाणार असून त्यापूर्वी किंवा त्यानंतर विराटने ब्रेक घेणे आवश्यक असेल, असे शास्त्री यांचे मत आहे.