आगामी आशिया चषक टी-20 स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर माजी लंकन फलंदाज महेला जयवर्धनेचे प्रतिपादन, आशिया चषक स्पर्धा 27 ऑगस्टपासून
वृत्तसंस्था /दुबई
विराट कोहली बॅड पॅचवर मात करण्यात लवकरच यशस्वी ठरेल, असा विश्वास माजी लंकन फलंदाज महेला जयवर्धनेने व्यक्त केला. आशिया चषक टी-20 स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर तो बोलत होता.
भारताने आशिया चषक स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला असून यात विराट कोहली व केएल राहुल यांनी राष्ट्रीय संघात पुनरागमन केले. याचवेळी जसप्रित बुमराह व हर्षल पटेल दुखापतीमुळे खेळू शकणार नसल्याचे जाहीर करण्यात आले. भारतीय संघाची सलामी लढत दि. 28 ऑगस्ट रोजी कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. ही लढत दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर आयोजित केली जाईल.
विराट कोहलीने या वर्षभरात 4 टी-20 सामने खेळले असून त्यात जेमतेम 81 धावा जमवल्या आहेत. यात केवळ एक अर्धशतकाचा समावेश असून त्याची सरासरी देखील 20.25 अशी किरकोळ राहिली आहे.
विराटला त्यानंतर विंडीज दौऱयातून विश्रांती देण्यात आली होती. यंदाच्या आयपीएल स्पर्धेतही या दिग्गज फलंदाजाला झगडत रहावे लागले असून 16 सामन्यात 22.73 च्या सरासरीने केवळ 341 धावा जमवण्यात त्याला यश आले. आरसीबीतर्फे विराटला यादरम्यान 2 अर्धशतके जमवता आली.
पाँटिंगशी सहमती
ऑस्ट्रेलियातील टी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी विराटला पूर्ण सूर सापडणे अतिशय महत्त्वाचे असून यासाठी त्याला आशिया चषक स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात निश्चितपणाने संधी द्यावी, अशी सूचना माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटिंगने केली होती. त्याच्याशी जयवर्धनेने येथे सहमती दर्शवली.
‘विराट सध्या ज्या संक्रमणातून जात आहे, ते दुर्दैवी आहे. मात्र, तो अव्वल दर्जाचा खेळाडू आहे आणि या बॅड पॅचमधून बाहेर येण्यासाठी ज्या बाबी आवश्यक आहेत, त्या त्याच्याकडे आहेत. फॉर्म तात्पुरता असतो. क्लास कायमचा असतो, हे विराट निश्चितपणाने दाखवून देईल’, असे जयवर्धनेने नमूद केले.
केएल राहुलच्या फॉर्मबाबत साशंकता
केएल राहुलला यंदा सातत्याने दुखापतीशी झगडत रहावे लागले असून अगदी अलीकडेच तो कोरोनावर मात करुन संघात परतला. त्याने आयपीएलही गाजवले. लखनौ सुपरजायंट्स संघाचे प्रतिनिधीत्व करताना 616 धावांचे योगदान दिले. मात्र, अगदी अलीकडे फारसे क्रिकेट खेळले नसल्याने याचा त्याला फटका बसू शकतो, असा जयवर्धनेचा होरा आहे.
‘अलीकडे मॅच प्रॅक्टिस मिळालेली नाही, ही चिंता आहे. त्यामुळे, आगामी सामन्यात तो जितका वेळ खेळपट्टीवर टिकून राहील, तितके ते त्याच्या पथ्यावर पडेल’, असे जयवर्धने म्हणतो. जर आशिया चषक स्पर्धेत केएल राहुलला त्याचा सर्वोत्तम सूर सापडला नाही तर रिषभ पंत-रोहित अशी लेफ्ट-राईट जोडी उतरवण्याबाबत विचार करणे योग्य ठरेल, याचा जयवर्धनेने येथे उल्लेख केला.
आशिया स्पर्धेसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, हार्दिक पंडय़ा, रविंद्र जडेजा, आर. अश्विन, यजुवेंद्र चहल, रवि बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, अवेश खान.
राखीव खेळाडू : श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, दीपक चहर