दोडामार्ग – प्रतिनिधी
Virdi village faces threat of Karnataka-made water crisis; People of Sindhudurg support
कर्नाटक सरकार गोव्याच्या दिशेने येणाऱ्या म्हादई नदीचे पाणी वळविण्याचा प्रकार करत आहे. त्याने फक्त गोवा राज्याला त्रास होणार नसून त्याची सुरूवात महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यामधील विर्डी गावापासून होणार आहे. विर्डी गावातील वाळवंटी नदीचा प्रवाह बंद होणार असून गावावर जलसंकट ओढवणार आहे. त्यामुळे विर्डी गावाचा आवाज बनण्यासाठी दोडामार्ग तालुक्यासह सिंधुदुर्गवासीयांनी साथ द्या असे भावनिक आवाहन उपसरपंच एकनाथ गवस यांनी केले आहे.शिवाय आमची जन्मभूमी विर्डी असली तरी कर्मभूमी गोवा आहे. गोवा सरकारलाही पाठींबा देण्यासाठी कर्नाटक सरकारच्या नदीचा प्रवाह अडविण्याच्या धोरणाला हाणून पाडण्यासाठी एकमुखी संघर्षाचा निर्धार विर्डीवासीयांनी केला असून गोव्यानंतर सिंधुदुर्गवासीयांच्याही रोषाला कर्नाटक सरकारला सामोरे जावे लागणार आहे.
सध्या कर्नाटक सरकारच्या म्हादई नदीचा प्रवाह बदलण्याच्या निर्णयाविरोधात गोव्यात संघर्षाचे वातावरण सुरू आहे. गोव्यात प्रवेश करणारी ही नदी कर्नाटकातून महाराष्ट्रातील विर्डी येथून प्रवेश करते. त्यामुळे गोव्याला जरी या नदी प्रवाहाचा फटका बसत असला तरी सुरुवात विर्डी गावातून होणार आहे. याबाबत जनजागृतीची पहिली बैठक येथील मंदिरात पार पडली. यावेळी उपसरपंच एकनाथ गवस यांसह कॅप्टन नितीन धोंड, पर्यावरण प्रेमी निर्मल कुलकर्णी, उद्योजक विक्रम जैन, जॅक सुखजा, श्री. सुरज, व्हॅन्सी फर्नांडिस, देवस्थान कमिटीचे अध्यक्ष भगवान घाडी, वनश्री फाउंडेशनचे संजय सावंत, अमित सुतार, देवेंद्र शेटकर, ग्रामपंचायत सदस्य निकिता बोकारकर, उर्मिला गवस, दीक्षा बांदेकर, पद्मजा गवस व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थिय होते. बैठकीचे आयोजन विर्डी क्रिकेट प्रीमियर लीग अध्यक्ष उमेश साटेलकर यांनी केले होते. तर बैठकीचे सूत्रसंचालन आकाश गावस यांनी केले
[ विर्डी गावाला सिंधुदुर्गवासीयांनी साथ द्या ! ]
कर्नाटक सरकार गोव्याच्या दिशेने येणारा पाणी प्रवाह रोखत आहे. याचा दुष्पपरिणाम विर्डी गावावर होणार आहे. येथील वज्रसखल नदीपासून ते वाळवंटी नदीचा प्रवास संपुष्टात येण्याची भीती आहे. शिवाय वज्रसखल धबधबा बंद होऊ शकतो. तसेच फेब्रुवारी महिन्यांपर्यंत नदीला असणारे पाणी प्रवाह लवकर संपणार आहे. त्यामुळे गावात पिण्याच्या पाण्याची पातळी गाठणार आहे. पाळीव जनावरे ते वन्य प्राणी यांना पणावठेही शिल्लक राहणार नाहीत. नदी काठच्या बागायतींना ही धोका आहे. हे लक्षात घेऊन गोवा सरकारला पाठींबा देण्यासाठी आणि विर्डी गाव वाचविण्यासाठी आवाज उठवला जाईल सुरुवातीला गावातून सह्यांची मोहीम राबविली जाईल. हा फक्त विर्डी गावपूरता प्रश्न सीमित नाही. तर पश्चिम घाटातील अनेक गावांना याचा फटका बसणार आहे. त्यामुळे विर्डी गावाचा आवाज शासन दरबारी पोहचविण्यासाठी दोडामार्गवासीयांसह सिंधुदुर्ग वासीयांनी साथ द्यावी असे आवाहन उपसरपंच एकनाथ गवस व उपस्थितांनी केले.
[ अजून सतरा धरणे बांधण्याची आहेत. ]
कॅप्टन नितीन धोंड म्हणाले, गेली 20 वर्षे कर्नाटक सरकारचा गोव्याकडे येणारे पाणी वळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. सुरूवातीला केवळ दोन धरणे बांधणार अशा प्रकारची भूल कर्नाटक सरकार दाखवत असले तरी एकूण सतरा धरणे बांधण्याचा इरादा कर्नाटकचा आहे. तसे झाल्यास जलस्रोत कर्नाटकच्या खाली येणे मुश्किल आहे. अलमट्टी सारखे धरण जवळपास 70 टीएमसी क्षमता असणारे पाणी कर्नाटककडे असताना हा अट्टाहास का ? असे कॅप्टन धोंड म्हणाले.
[ आजच गाव वाचवायला हवा ! – कॅप्टन धोंड ]
कॅप्टन धोंड पुढे म्हणाले विर्डीतील नदीला वाळवंटी नाव आहे. मात्र या नदीचे खरेखुरे वाळवंट होण्यापासून नदीला वाचवायचे असेल तर कर्नाटकच्या विरोधात आजच संघर्ष उभा केला पाहिजे कारण ज्यावेळी म्हादईचे पाणी अडविले जाईल त्यावेळी त्याचा सगळ्यात पहिला फटका विर्डीसह जवळील तळेखोल व अन्य गावांच्या जलस्त्रोताला बसणार आहे. कोणत्या पक्षाचे सरकार आहे या राजकीय विचारा पेक्षा शास्त्रीय विचार करून संपूर्ण दोडामार्ग तालुक्याने आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याने विर्डीवासीयांचा पाठी उभे राहायला पाहिजे. अन्यथा विर्डीला येणारे पाणी कर्नाटक सरकार हुबळी धारवाडला नेऊन येथील नदीचे वाळवंट करणार आहे.
[ एकमुखाने संघर्षाचा निर्धार – भगवान घाडी ]
येथील देवस्थान कमिटीचे अध्यक्ष भगवान घाडी म्हणाले , कर्नाटक सरकार जे धोरण राबवत आहे. त्याच्या विरोधात येथील गाव आणि ग्रा. पं. उभी राहील आणि एकमुखाने संघर्षाचा निर्धार आम्ही करत आहोत. संजय सावंत म्हणाले, कर्नाटक सरकार ज्या पद्धतीने रणनिती करत आहे ते पाहता येथील जलस्रोत संपुष्टात येणार आहेत. त्यामुळे लोकसंघर्ष उभा राहून जागरूक नागरिकांनी पुढे येणे गरजेचे आहे. पर्यावरण प्रेमी निर्मल कुलकर्णी म्हणाले कर्नाटक सरकार केवळ गोव्याला धोक्यात आणत नाही तर पश्चिम घाटालाही याचा मोठा फटका बसणार आहे. कित्येक किलोमीटर वळविण्यात येणारे पाणी हे नैसर्गिक तत्वांच्या मुळाशी घाला घालणारे आहे.
कर्नाटक सरकारची अरेरावी बंद करण्यासाठी फक्त विर्डी गाव एकत्र येऊन काही होणार नाही. विर्डी गाव वाचविण्यासाठी सिंधुदुर्गातील तमाम पर्यावरण प्रेमी, सर्वपक्षीय, नेते पदाधिकारी , गावागावातील सरपंच, यांनी पुढाकार घ्यावा असे भावनिक आवाहन येथील ग्रामस्थांनी केले आहे.
(काय होईल परिणाम )
▪️वाळवंटी नदी सुष्क होईल
▪️धबधबा बंद होईल
▪️जंगलातील अनेक पाणवठे बंद होतील
▪️बागायतीना पाणी मिळणार नाही
▪️निसर्गसंपन्न गावात पाण्याचे दुर्भीक्ष येईल