दक्षिण भारतीय वेशभूषेत वाराणसी येथे आगमन, अनेक कार्यक्रमांमध्ये सहभाग
वृत्तसंस्था/ वाराणसी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला लोकसभा मतदारसंघ असणाऱया वाराणसीला भेट दिली आहे. यावेळी त्यांनी दक्षिण भारतीय वेशभूषा केली होती. सदरा, लुंगी आणि उपरणे अशा वेशभूषेत ते विमानातून उतरले. त्यांचे स्वागत ‘वणक्कम काशी आणि हर हर महादेव’ या घोषणांनी झाले. त्यानंतर त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठाच्या ऍंफीथिएटर मैदानात एक महिना चालणार असलेल्या ‘काशी-तामिळ संगमम्’ या अभियानाचे उद्घाटन केले. दक्षिण भारत आणि उत्तर भारत यांची संस्कृती एकच आहे, असा संदेश या अभियानातून दिला जाणार आहे.
या कार्यक्रमात काशी आणि तामिळनाडू यांचे संबंध तसेच श्रद्धा आणि संस्कृतींमधील समानता यांवर आधारित लघू चित्रपट दाखविला गेला. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी तामिळ भाषेत लिहलेल्या तिरुक्कुरल या पुस्तकासमवेत काशी-तामिळ संस्कृतीवर आधारित अन्य काही पुस्तकांचे प्रकाशन केले. त्यानंतर त्यांनी तामिळनाडूतून येथे आलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधी मंडळाशी चर्चा केली. तसेच तामिळनाडूतील मठ-मंदिरांच्या नऊ शैव महंतांना सन्मानित केले.
या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. त्यांनी त्यांच्या भाषणाचा प्रारंभ ‘वणक्कम, नमस्कारम’ या तामिळ घोषणेसह हर हर महादेवच्या जयघोषाने केला. विश्वेश्वराच्या पवित्र भूमीत रामेश्वरच्या पवित्र भूमीतून आलेल्या सर्व अतिथींचे मी स्वागत करतो, अशा शब्दात त्यांनी भाषणाचा प्रारंभ केला. काशी-तामिळ संगमम् या कार्यक्रमात तामिळनाडूच्या 12 विभिन्न जनसमुहांमधून आलेल्या प्रतिनिधींना काशीभ्रमण करण्याची संधी दिली जाईल. तसेच काशी आणि तामिळनाडू यांच्यातील संबंधांवर तज्ञांचा परिसंवाद ठेवला जाईल. तामिळनाडूतील तेनकाशी येथे भगवान विश्वनाथाचे प्राचीन मंदिर आहे. तसेच तामिळनाडूमध्ये शिवकाशी हे पवित्र स्थानही आहे. यावरून तामिळ संस्कृती आणि उत्तर भारतातील काशीची संस्कृती यांच्यातील पवित्र संबंध स्पष्ट होतात. दक्षिण भारत आणि उत्तर भारत असा कोणताही भेदभाव नसून तो केवळ राजकीय कारणास्तव निर्माण करण्यात आला आहे, असा आरोपही त्यांनी केला.
दोन्हींकडे सांस्कृतिक सुरक्षितता
काशी आणि तामिळनाडू या दोन्ही ठिकाणी भारताची प्राचीन संस्कृती सुरक्षित आहे. भगवान शंकराच्या मुखातून ज्या दोन भाषा बाहेर पडल्या त्यातील एक संस्कृत तर दुसरी तामिळ होती, अशी मान्यता आहे. यातून भारताची एकात्मता दिसून येते. आज सर्वसामान्य नागरिकाला या एकात्मतेची आवश्यकता आहे. भारताचे भवितव्य त्याच्या एकात्म संस्कृती आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
16 डिसेंबरपर्यंत महोत्सव
काशी-तामिळ संगमम् हा महोत्सव 16 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या महोत्सवात 75 स्टॉल्स लावण्यात आले असून त्यात काही तामिळ स्टॉल्सही आहेत. कृषी, संस्कृती, साहित्य, संगीत, आहार, हातमागावरील कापड आणि हस्तकला, लोककला आदी विषयांमधील भारताचे वैभव प्रदर्शित करणारे हे स्टॉल्स आहेत. हा महोत्सव दक्षिण भारत आणि उत्तर भारत यांच्यातील सेतूचे काम करणार असून तामिळनाडूतील अनेक उत्पादनांचे स्टॉल्सही येथे आहेत.
ग्रीनफिल्ड विमानतळाचे उद्घाटन
पंतप्रधान मोदी यांनी वाराणसीच्या दौऱयाआधी अरुणाचल प्रदेशातील प्रथम ग्रीनल्डि विमानतळाचे उद्घाटन केले. या विमानतळाचे नाव ‘न्यू दोनई पोलो विमानतळ’ असे आहे. त्यांनी अन्य एका कार्यक्रमात येथे उभारण्यात आलेल्या ऊर्जाप्रकल्पाचे उद्घाटन करून तो देशाला अर्पण केला. या ऊर्जा प्रकल्पाचे नाव कामेंग जल ऊर्जा प्रकल्प असे आहे. ईशान्य भारतातील हा प्रकल्प गेल्या 8 वर्षातील चौथा आहे. त्याला 8500 कोटी रुपये खर्च आलेला आहे. या प्रकल्पामुळे अरुणाचल प्रदेश हे राज्य ऊर्जा टंचाई मुक्त होणार आहे. अन्य राज्यांना ऊर्जा पुरविण्याची क्षमताही या प्रकल्पामुळे या राज्याला मिळणार आहे.