केंद्रीय प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांचे मत : इफ्फी महोत्सवात इंडियन पॅनोरमाचे उद्घाटन
प्रतिनिधी /पणजी
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील ’इंडियन पॅनोरमा’ हा अत्यंत महत्वाचा विभाग असून त्याच्या माध्यमातून भारतीय आणि गोमंतकीय सिनेमा आंतरराष्ट्रीय समीक्षक आणि प्रतिनिधींसमोर सादर होतो. या महोत्सवामुळे भारतीय कला, संस्कृती तसेच समाजजीवनाचे भावविश्व यांचेही प्रदर्शन घडते, असे प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर यांनी केले.
इफ्फीमध्ये ’इंडियन पॅनोरमा’ विभागाचे उद्घाटन केल्यानंतर मंत्री ठाकुर बोलत होते. आयनॉक्स चित्रपटगृहात आयोजित या कार्यक्रमास त्यांच्यासोबत माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्र, एनएफडीसीचे सीईओ रवींद्र भाकर आदींची उपस्थिती होती.
मान्यवरांकडून चित्रपटांची निवड
देशभरात चित्रपट जगतात कार्यरत सुप्रसिद्ध व्यक्तींनी भारतीय पॅनोरमामध्ये सादर होणाऱया चित्रपटांची निवड केली आहे. यामध्ये फिचर फिल्मस्साठी 12 परीक्षक तर नॉन-फिचर फिल्मस्साठी 6 परीक्षकांनी चित्रपटांच्या निवडीचे काम केले. फिचर प्रकारच्या चित्रपटांसाठी 12 परीक्षकांच्या पथकाचे नेतृत्व मान्यवर दिग्दर्शक आणि संकलक अध्यक्ष विनोद गणात्रा यांनी केले तर नॉन-फिचर प्रकारच्या चित्रपटांसाठी 6 परीक्षकांनी सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते, निर्माते, लेखक आणि राष्ट्रीय चित्रपट पारितोषिक विजेते ओईनाम डोरेन यांच्या नेतृत्वाखाली परीक्षणाचे काम केले.
दिग्दर्शक, कलाकारांचा सन्मान
दोन्ही विभागात 45 चित्रपग्नटांचे प्रदर्शन होणार असून त्यात 25 फिचर फिल्मस् आणि 20 नॉन फिचर फिल्मस्चा समावेश आहे. या सर्व चित्रपट निर्मात्यांचे मंत्री ठाकूर यांनी अभिनंदन केले. तसेच सर्वोत्तम चित्रपटांची निवड केल्याबद्दल ज्युरिंचे आभार मानले. ’हदिनेलेंटू’ आणि ’द शो मस्ट गो ऑन’ या शुभारंभी चित्रपटांच्या निर्मात्यांचा ठाकुर यांनी सन्मान केला.
संपादन टेबलवर जन्मला चित्रपट
सन्मानाला उत्तर देताना ’द शो मस्ट गो ऑन’ च्या दिग्दर्शक दिव्या कावसजी यांनी, ‘करोना बंदीच्या काळात आपण व चित्रपट निर्माता असलेल्या भाऊ असे दोघांनीही जुन्या पारशी नाटय़ कलाकारांच्या तालमींचे चित्रिकरण संपादीत करण्याचा निर्णय घेतला. पारशी नाटकांच्या त्या महान कलाकारांचे शेवटचे चित्रित सादरीकरण संपादित करताना आपण भारावून गेले. हा चित्रपट संपादन टेबलवर जन्मास आला आहे असे आपण अभिमानाने सांगू शकते, असे त्या म्हणाल्या.
चित्रपटाला मिळालेल्या सन्मानाबद्दल इफ्फीचे आभार मानताना दिग्दर्शक पृथ्वी कोनानूर यांनी, हा चित्रपट आपल्या काळातील शहरी समाजातील किशोरवयीन मुलांना भेडसावणाऱया संवेदनशील समस्यांवर भाष्य करतो, असे सांगितले.