कोल्हापूर प्रतिनिधी
पुणे जिह्यातील वाबळेवाडी येथील आंतरराष्ट्रीय प्राथमिक शाळेस करवीर तालुक्यातील अधिकारी व शिक्षकांनी भेट देऊन शैक्षणिक माहिती घेतली. केवळ 36 घरे असलेल्या वाबळेवाडी ग्रामस्थांचे योगदान व दत्तात्रय वारे या शिक्षकाच्या प्रयत्नामुळे सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून 32 पटाच्या द्विशिक्षकी शाळेचे रूपांतर आता आंतरराष्ट्रीय ओजस स्कूलमध्ये झाले आहे. वाबळेवाडी ग्रामस्थांनी यात्रा, यात्रेतील तमाशा यावर होणारा खर्च बंद करून विद्येचे मंदिर उभारण्यास योगदान दिले. हे आंतरराष्ट्रीय स्कूल आता संपूर्ण राज्यात नावलौकिकास पात्र झाले आहे.
शिरूर तालुक्यातील शिक्रापूर ग्रामपंचायत हद्दीतील वाबळेवाडी शाळेचा 2012 ला पहिली ते चौथीपर्यंतची विद्यार्थी संख्या केवळ 32 होती.दोन शिक्षक कार्यरत होते. दत्तात्रय वारे या ध्येयवेडय़ा शिक्षकांने येथे झपाटून काम करण्यास सुरुवात केली.प्रारंभी वारे यांनी स्वतः पदरमोड खर्च करत शाळेत सुधारणा घडवून आणल्या. शिक्षक मनापासून काम करत असल्याचे पाहून ग्रामस्थांनी कोटय़ावधी रुपये किमतीची पावणेदोन एकर जागा शाळेस मोफत दिली. हळूहळू शाळेत विविध सोयी सुविधा होऊ लागल्या. श्री.श्री रविशंकरजींच्या आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेमार्फत कोटय़ावधी रुपये खर्च करून अद्यावत इमारत उभा केली आहे. शाळा परिसरात सर्वत्र सौर ऊर्जेचा वापर केला जातो. शाळेत भिंतीवर कुठेही सुविचार लिहिलेले नाहीत. मात्र येथील वर्गाच्या भिंती ,कंपाउंड काचेचे आहे. वर्ग खोल्यांची रचना पारदर्शी आहे. झाडावेलींनी परिसर फुलून गेला आहे. बंदिस्त वर्ग खोलीत नव्हे तर निसर्गाच्या सानिध्यातच खुल्या वातावरणात अध्ययन-अध्यापनाचे कार्य सुरू असते.
कोणत्याही वर्गात टेबल खुर्ची नाही. इथे कोणालाही आपापली जबाबदारी सांगावी लागत नाही. प्रत्येक जण आपापले काम स्वयंप्रेरणेने मनापासून करत असतो.शंभर टक्के लोकसहभागातून विकसीत झालेली वाबळेवाडीची झिरो एनर्जी स्कुल आहे. दहा वर्षांपूर्वी 32 पटाच्या शाळेत आता पहिली ते आठवीचा पट 550 असून बारा शिक्षक कार्यरत आहेत. 20 किलोमीटर परिसरातून मुले शाळेत येतात.अंगणवाडीत प्रवेश घेतलेल्या मुलांना पुढील वर्गात प्रवेश दिला जातो.शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पाचवी व आठवीचे सकाळी सात ते सायंकाळी सात असे बारा तास वर्ग भरतात.वर्षभरात शिक्षक व विद्यार्थी एकही सुट्टी घेत नाहीत.सण समारंभाकडे ही दुर्लक्ष केले जाते. शिष्यवृत्तीच्या मार्गदर्शनासाठी शिक्षक नेहमीच कोल्हापूरशी संपर्कात राहतात.दत्तात्रय वारे या शिक्षकाचे मोठे योगदान या शाळेसाठी आहे. त्यांना एकनाथ खैरे सह अन्य शिक्षकांची साथ लाभली.
करवीर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी समरजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या शैक्षणिक सहलीत ज्येष्ठ विस्तार अधिकारी एस.के.यादव, विश्वास सुतार, कृष्णात कारंडे,संजय कुर्डूकर,चंद्रकांत पाटील, राजेंद्र कोरे किशोरी चौगुले, मीना गारे ,सुजाता गुरव ,राजेंद्र पाटील,अशोक नायकवडे,डी.डी.पाटील,आर.डी. कांबळे, तुषार पाटील, राणेश्वर थोरबोले आदी सहभागी झाले होते. सलीम जमादार यांनी सहलीचे नियोजन केले.
वारेचे शैक्षणिक विचार
द्विशिक्षकी शाळेचे रूपांतर आंतरराष्ट्रीय शाळेत करण्यात दत्तात्रय वारे या शिक्षकांचे मोठे योगदान आहे. त्यांचा आदर्श घेऊन परिसरात अनेक शाळांनी शैक्षणिक दर्जा उंचाविला आहे.वारे सरांचे शैक्षणिक विचार लोकांना भावले आहेत. वारेच्या वर निलंबनाची कारवाई झाली. पुन्हा त्यांना सेवेत घेतले. सध्या ते शासनाच्या शिक्षण विभागाकडे विशेष कार्य अधिकारी म्हणून काम करतात. जोपर्यंत वारे निर्दोष होत नाहीत व परत वाबळेवाडी शाळेत येत नाहीत, तोपर्यंत शिक्षक,पालक व विद्यार्थी अशा सुमारे शंभर लोकांनी अनवाणी रहाण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दीड वर्षापासून ते अनवाणी राहत आहेत. वारे या ध्येयवेड्य़ा शिक्षकाचे शैक्षणिक विचार असे लोकांच्या मनात, हृदयात पोहोचले आहेत.