पश्चिम भारत आणि महाराष्ट्रात दुसरा क्रमांक : विटा शहर पुन्हा देशात चमकले
प्रतिनिधी/विटा
स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये विटा शहराने देशात सहावा क्रमांक पटकावला आहे. गतवर्षी विटा शहर यामध्ये अव्वल ठरले होते. यावर्षी देशात सहावे तर पश्चिम भारत आणि महाराष्ट्र राज्यात शहराचा दुसरा क्रमांक राहिला आहे. विटा शहरासाठी हे यश कौतुकास्पद आहे. संपूर्ण देशामध्ये नावलौकिक असणाऱया विटा शहराने कचरामुक्त आणि हागणदारीमुक्त शहर ओडीएफ प्लसप्लस नामांकने मिळवली आहेत.
विटा शहर कचराकुंडीमुक्त, कचरामुक्त, प्लास्टिकमुक्त आणि हागणदारीमुक्त आहे. शहरातील प्रत्येक नागरिकाला याचा सार्थ अभिमान आहे. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये देशातील चार हजार 310 शहरांनी सहभाग नोंदविला होता. विविध घटकांवरती शहराचे मूल्यांकन केले गेले. यामध्ये शहर स्वच्छता, रहिवासी व्यापारी आणि सार्वजनिक भागाची नियमित स्वच्छता, सामुदायिक आणि सार्वजनिक शौचालय स्वच्छता आणि व्यवस्थापन, डिजिटल सेवा सुविधा, शहराचे सुशोभीकरण, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन, मैला व्यवस्थापन, शहरातील विविध आस्थापना, नागरिकांचा सहभाग आणि जनजागृती, 3 आर प्रणाली, 100 टक्के कचरा वर्गीकरण, कलेक्शन आणि प्रोसेसिंग, होम कम्पोस्टिंग, नाले तलाव व्यवस्थापन आणि स्वच्छता अशा अनेक घटकांचा समावेश केला जातो. हे सर्व घटक शहराच्या सर्वांगीण विकासाला पोषक असून याद्वारे शहराचा शाश्वत विकास होण्यास मदत होते.
गतवर्षी देशात अव्वल आल्यानंतर विटा शहराचा दिल्लीत तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते सन्मान झाला होता. यावेळी शहराने स्वच्छतेत सातत्य राखत देशाच्या एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असणाऱया शहरांच्या यादीत टॉप टेन मध्ये स्थान मिळवले आहे. देशात शहर सहावे तर पश्चिम भारत आणि महाराष्ट्र राज्यात शहराचा दुसरा क्रमांक राहिला आहे. संपूर्ण देशामध्ये नावलौकिक असणाऱया विटा शहराने कचरामुक्त आणि हागणदारीमुक्त शहर ओडीएफ प्लसप्लस नामांकने मिळवली आहेत. शहराच्या यशाचे कौतुक होत आहे. या यशाबद्दल नेते वैभव पाटील तसेच माजी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांनी शहरातील नागरिकांचे अभिनंदन केले आहे.