निसर्गनिर्मित अशी कोणतीही वस्तू निरुपयोगी नसते, असे तत्व आहे. केवळ टाकाऊ वाटणाऱया वस्तूंचा उपयोग व्यवस्थित करणे हे महत्त्वाचे आहे. ज्वालामुखीच्या उदेकातून निर्माण होणारी राख ही अशीच एक टाकाऊ वस्तू समजली जात होती. मात्र, या राखेचा उपयोग दूषित पाणी शुद्ध करण्यासाठी होऊ शकतो, हे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. बनारस हिंदू विद्यापीठाच्या आयआयटी महाविद्यालयातील संशोधकांनी या राखेपासून पाणी शुद्ध करणारे द्रव्य बनविण्यात यश मिळविले आहे. ही राख बेन्टोनाईट क्ले या नावाने ओळखले जाते.
या राखेत पाण्यातील निरुपयोगी आणि विषारी धातू क्षारांचे शोषण करण्याची क्षमता असते. मात्र, यासाठी राखेवर काही रासायनिक प्रक्रिया करावी लागते. याच प्रक्रियेचा शोध या संशोधकांनी लावला आहे. दूषित पाण्यात तांबे, निकेल आणि जस्त यासारख्या धातूंचे क्षार असतात. हे क्षार या राखेपासून बनविलेल्या द्रव्यामध्ये विनासायास आणि सहजगत्या शोषले गेल्याने पाण्यातून दूर होतात. भारतात बऱयाच ठिकाणी भूमिगत जलस्रोतांमध्ये असे क्षार आढळतात. त्यामुळे हे पाणी मुबलक असूनही पिण्यास अयोग्य असते. अशा पाण्यापासून या राखेच्या साहाय्याने पिण्याचे शुद्ध पाणी अत्यंत कमी खर्चात तयार करण्यात येऊ शकते, असे या संशोधकांचे म्हणणे आहे. प्रा. डॉ. विशाल मिश्र यांच्या नेतृत्वात हे संशोधन होत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचे साहाय्यही या संशोधनात घेण्यात आले आहे. या द्रव्याच्या आठ गोळय़ा एक लिटर पाण्यात घातल्यास एक तासात पाणी शुद्ध होते. राखेपासून केलेल्या या द्रव्यामध्ये मृतत्वचा सुटी करण्याचीही क्षमता असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या द्रव्याचा विविधांगी उपयोग होऊ शकेल.