प्रतिनिधी /काणकोण
काणकोणचे नागरीक सुसंस्कृत असून गोव्याच्या विविध क्षेत्रात या तालुक्यांने स्वताचे असे खास अस्तित्व दाखवून दिले आहे. दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या पंचायत निवडणुकीत भाजपाने जे उमेदवार पुरस्कृत केलेले आहेत त्यांचा संघटितपणे पाडाव करण्यासाठी काणकोणच्या जनतेने पुढाकार घ्यावा असे आवाहन गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी काणकोण येथे स्थानिक पत्रकारांशी वार्तालाप करताना केले.
श्रावणी सोमवार निमित्त श्री सरदेसाई यांनी श्रीस्थळच्या श्री मल्लिकार्जुन देवाची भेट घेतली. त्या वेळी स्थानिक पत्रकारांनी त्याना घेरले त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्या बरोबर यावेळी गोवा फॉरवर्डचे प्रशांत नाईक, रॅमी बोर्जिस, विकास भगत, गुरू बांदेकर आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. श्रीस्थळच्या श्री मल्लिकार्जुन देवस्थानचे अध्यक्ष विठोबा देसाई यांनी त्यांचे यावेळी उत्स्फुर्त असे स्वागत केले.
भाजपने सर्व नियम धाब्यावर बसवून ही निवडणूक लादली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाचे सर्व हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न सद्या चालू आहे. गावच्या समस्या सोडविण्यासाठी ज्या व्यक्ती आजवर भांडत आहेत, त्याना डावलून प्रत्येक ठिकाणी भाजपने फॅमिली राज्य करण्याचे काम केले आहे. आपल्या सग्या सोयऱयांना निवडणुकीत उतरवून सत्तेचा गैरवापर केला जात आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे जे उमेदवार निवडून आलेले आहेत. त्यातील बहुतेक जण काठावर पास झालेले आहेत. म्हणून त्याना धडा शिकविण्याची ही योग्य वेळ आहे असे मत श्री. सरदेसाई यांनी मांडले.
विधानसभा निवडणुकीच्या वेळी विरोधी गटाने केलेली युती योग्य तरेने हाताळण्यात आली नाही. मात्र, काणकोण मतदारसंघात सर्व शक्ती एकवटल्या आहेत. मतदारांना बऱया वाईटाचा अनुभव आलेला आहे. हे सरकार घोटाळय़ांचे सरकार आहे. आपण एकमेव आमदार असताना विधानसभेत आपण सत्ताधरी गटाला नामोहरम करण्याचा प्रयत्न केला. ही विधानसभा लवकरच आटोपली नसती सर्व घोटाळे चव्हाटय़ावर आणता आले असते. असे सांगून स्थानिक स्वराज्य संस्था जिवंत आहेत हे दाखविण्यासाठी आणि गोवा राज्य हे प्रगतीशिल राज्य आहे हे दाखविण्यासाठी भाजपच्या उमेदवारांचा पाडाव करण्यासाठी सर्वांनी मतदार करावे याचा त्यानी यावेळी पुनरूच्चार केला.